राजेंद्र पाटील राऊत
🌹गुरुदेव दत्त🌹
🔥संकलन 🔥
⭕सिध्दांत चौधरी गुरुजी पुणे भोसरी⭕ प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क
#आपली संस्कृती व शास्त्र.
#श्रापित दोष आणि श्राद्ध पक्ष ..
कुंडली मधे पितृ दोष, मातृ दोष, भ्रातृ दोष, गुरु दोष, प्रेत दोष या दोषांची गणना शास्त्राने श्रापित दोष यामध्ये केली आहे.
शास्त्राधारे यामध्ये तीव्र फलदायी मातृ पितृ दोष,प्रेत दोष, गुरु दोष मानले आहेत. जे जातकाच्या जीवनात प्रभावी ठरतात.
वेदशास्त्रामधे आपल्याला उल्लेख सापडतो कि संतती कितीही त्रासदायक, कष्टदायक असली तरी माता पिता आपल्या संतती ला श्राप देत नाहीत.मग मातृ पितृ दोष कुंडली मधे का निर्माण होतात.
जीवात्मा जेंव्हा या जगाचा निरोप घेतो त्यानंतर त्या जीवात्म्याच्या पुढील सदगती साठी आपल्या शास्त्राने काही विधी सांगितल्या आहेत. दशक्रिया, बारा दिवस, तेरा दिवस, या सारख्या विधी आपल्या आपल्या पितरांना सदगती प्राप्त करून देतात. जेंव्हा या विधी होत नाहीत किंवा काही कारणासत्व राहून जातात किंवा हे विधी कालबाह्य मानून केले जात नाहीत किंवा त्या शास्त्रोक्त पद्धतीने होत नाहीत तेंव्हा जीवात्मा जे कष्ट भोगत असतो. त्या कष्टातून जे भाव निर्माण होतात त्याला श्राप असे संबोधले आहे.
उदा. आपण एखाद्या व्यक्ती कडून अपेक्षा ठेवतो. ती व्यक्ती जर ती अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर आपले अंतर्मन कुठेतरी दुःखी होते.आणि त्या दुःखी अंतर्मनातून जे भाव निर्माण होतात त्याला श्राप असे संबोधित केले आहे.
तसेच पूर्वज किंवा आपले माता पिता आपल्या संतती साठी काही धनाच्या स्वरूपात संपत्ती सोडून जातात. पण संतती कडून त्यांच्या पुढील क्रिया कर्म होत नाहीत.तेंव्हा असा जीवात्मा जे कष्ट भोगत असतो तेंव्हा स्वाभाविक त्या भोगातून जे भाव निर्माण होतात कि मी माझ्या वंशा साठी इतकं सोडून आलो तर माझ्या वंशाने माझ्या सदगती साठी ही क्रिया कर्म केली असती तर फार बरं झाले असते.
कुंडली मधे हे दोष आपल्याला हेच दाखवत असतात कि आपले पूर्वज आज ही सदगती ला प्राप्त नाही झाले. ते आज ही कष्ट भोगत आहेत.
ज्यामुळे जातकाला आर्थिक, शारीरिक, वैवाहिक, संतती, शिक्षण, यामध्ये प्रकर्षाने त्रास भोगावा लागतो.
बऱ्याचदा कुंडली मधे वरील दोष पिढ्यानंपिढ्या पुढे येतात. जे अनेक पिढी चालू राहतात.
श्रापित योग या वरती श्राद्ध पक्ष हा एक सुंदर उपाय आहे.
श्राद्ध हे तीन प्रकारचे केले जाते. नित्य श्राद्ध, नैमित्तिक श्राद्ध, आणि काम्य श्राद्ध.
नित्य श्राद्ध मधे रोज पितरांची आठवण म्हूणन केल्या जाणाऱ्या क्रिया. कागावळ, दान धर्म, अन्नदान,अर्ध्य, तर्पण, इत्यादी.
काम्य श्राद्ध हे एका विशिष्ट व्यक्तीला उद्देशून केलेले श्राद्ध. नारायण बली,नागबली,त्रिपिंडी ही काम्यश्राद्धे होत.
तर नैमित्तिक श्राद्ध हे श्राद्ध पक्ष किंवा महालय श्राद्ध म्हणून ओळखले जाते. या पक्षाला विशेष महत्व या कारणाने आहे. कारण या पक्षात सर्व पितरांनचे श्राद्ध आपण करू शकतो किंवा त्यांच्या साठी दानपुण्य, अन्नदान या कालावधीत केले जाऊ शकते.
श्राद्ध पक्ष हा फक्त सर्वपित्री आमावस्या इतके दिवसच नसते. खूप लोकांना अडचणी मुळे या पंधरा दिवसात विधी करता येत नाहीत. महालय श्राद्ध व्यक्ती सूर्य कन्या राशी पासून जो पर्यंत वृश्चिक राशीत प्रवेश करत नाही तो पर्यंत करू शकतो. याचा कालावधी 2महिने असतो. याकालावधीत जातक आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध करून दान धर्म करून आपल्या पूर्वजांना सदगती प्राप्त करून देऊ शकतो.
कुंडली नुसार उपाय करून वरील दोषांचे निराकरण काही सोप्या उपायांनी करू शकता.
बद्रिकेदार, मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, इत्यादी ठिकाणी श्राध्द केल्यावर तेथील पुरोहित “आता यापुढे तुम्हाला श्राध्द करण्याची गरज नाही” असे आवर्जून सांगताना आढळतात. तसा शास्त्राधार नाही.स्थान महात्म्य हे लवकर गती मिळण्यास मदत करतं.बहुतेक तीर्थक्षेत्रावरील पुरोहित लोक आपल्या यजमानाकडून श्राध्द करून घेतल्यावर त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी पुन्हा कोणतीही श्राध्दे करण्याची आवश्यकता नाही, असेच सांगतात. वास्तविक यजमानाच्या लक्षात यावयास हवे की, ते अतिशयोक्तीपूर्ण गौरवोद्गार काढतात.एखादे आवडते प्रिय पक्वान्न पोटभर खायला मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीच्या तोंडून सहज उद्गार निघतात, “आता चार दिवस मुळीच जेवायला नको ” पण त्याचे उद्गार शब्दशः घ्यायचे नसतात. त्याप्रमाणे श्राध्द हे पितरांच्या तृप्तीसाठी जसे करणे आवश्यक आहे, तसे श्राध्दकर्त्याचे पितृविषयक कर्तव्य म्हणूनही करणे तितकेच आवश्यक आहे. यापैकी दुसरा प्रकार जास्त महत्वाचा आहे. कारण कर्तव्यचुत व्यक्ती इहपरलोकी परमदुर्देवी ठरते. त्यामुळे कोणत्याही तीर्थावर कितीही मोठ्या पर्वकाळात श्राध्दे केलेली असली तरी, श्राध्दविराम होऊ शकत नाही. तसा शास्त्रार्थ कोणत्याही धर्मग्रंथात दिलेला नाही. उलट तसे करणे शास्त्रविरूध्द ठरते…