राजेंद्र पाटील राऊत
निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू , अकलूज ग्रामस्थांचा इशारा
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता.माळशिरस ) ही आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायतअसलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचा नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना , त्यातच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालीय. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्ताव अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे.
शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये करावे अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिलाय.
आज अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते तसेच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता सध्या अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्या पडत असल्याने येथील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करावे, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता. सप्टेंबर २०१९ मध्ये त्या पद्धतीचा आदेश आधीसुद्धा शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे.
सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे, असे असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंतीपत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरं जाणं उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .