आशाताई बच्छाव
उम्मती ‘च्या वधू-वर सूचक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी
उम्मती फाउंडेशन व रॉयल मॅरेज ब्युरो,श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मुस्लिम वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. मुस्लिम समाजातील थोर सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पै. रफिकभाई शेख टीसी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात सुमारे 550 इच्छुक वधू-वरांनी सहभाग नोंदवुन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मेळाव्याचे उद्घाटन धर्मगुरु मुफ्ती रिजवान यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. वसंतराव जमधडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन नजीरभाई शेख, सरवरली सय्यद, पत्रकार प्रविणकुमार आहेर, सलीम पठाण सर, जोएफ जमादार, इब्राहिम शेख, सलीम शेख उपस्थित होते. या मेळाव्यात जवळपास 550 वधू-वर यांची नोंदणी झाली असून मोठ्या संख्येने पालक वर्गही उपस्थित होता. विशेष म्हणजे या मेळाव्यातच एक लग्न सुद्धा साध्या पद्धतीने पार पडला. यावेळी उम्मतीचे सचिव डॉ.तौफिक शेख यांच्या वतीने दिव्यांगांसाठी व्हील चेयरचे वाटप देखील करण्यात आले.
उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांनी प्रास्ताविकात मुस्लिम वधू- वर मेळावा घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली तसेच या मेळाव्यातून जमलेल्या निवडक लग्नासाठी संस्थेतर्फे आर्थिक मदत करण्याचेही आश्वासन दिले. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना मुफ्ती रिजवान यांनी यांनी इस्लाम धर्मात सर्वात पवित्र हा विवाह संस्कार असून मुलींच्या पालकांनी आपल्या मुलींसाठी फक्त श्रीमंत मुलगा एवढाच विचार न करता चारित्र्यसंपन्न, निर्व्यसनी, कर्तृत्ववान मुलगा पाहावा, असे सांगत मुस्लिम मधे सय्यद बागवान, मणियार हे सर्व एकच असुन यांच्यात भविष्यात आपापसात लग्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. जमधडे यांनी आजच्या सोशल इंजिनिअरिंगच्या व्यस्ततेच्या काळात पालकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी व आपल्या पाल्याला अनुरूप जोडीदार निवडण्यासाठी सर्वधर्म वधू-वर सूचक मेळावे अत्यावश्यक असल्याचे सांगितले तसेच मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल उम्मतीचे कौतुक केले. पत्रकार आहेर यांनी प्रत्येक पालकांना आपल्या पाल्याला जवळचे स्थळ मिळावे, असे वाटते. आपल्या जिल्ह्यात मुस्लिम समाज विखुरलेला असताना जिल्ह्यात पहिल्यांदाच हा मेळावा घेतल्याने विशेष आनंद वाटले असे सांगितले. रॉयल मॅरेज ब्युरोचे अध्यक्ष कलीम शेख व नदीम शेख यांनी उपस्थित पालकांना व इच्छुक वधू वरांना मार्गदर्शन केले.
अॅड. आरीफ शेख यांनी सूत्रसंचालना बरोबरच मेळाव्यात उपस्थित असलेल्या पालकांना कौटुंबिक न्यायनिवाड्या संदर्भात मोफत मार्गदर्शन केले. उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी आभार मानले. मेळावा यशस्वितेसाठी शहानवाज गुलाम, असलम सय्यद, युसूफ लाखाणी, इसाक शेख, आर सोहेल, समीर शेख, माजिद मिर्जा आदींनी पुढाकार घेतला.






