Home सामाजिक गृहिणी (घरातील कामांची जबाबदारी सगळ्यांची)

गृहिणी (घरातील कामांची जबाबदारी सगळ्यांची)

338
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_081838.jpg

गृहिणी

गृहिणी म्हणजे अशी स्त्री जी घराची संपूर्ण जबाबदारी सांभाळते.त्यामुळेच घरातील इतर मंडळी आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतात.भिंती, छप्पर, खिडक्या,दारे असलेल्या घराला जीवंतपणा येतो तो गृहिणीमुळेच.जरी ती नोकरी करीत नसली तरी तिला घरात असंख्य कामे असतात.गृहिणी होऊन राहणं वाटतं तितकं सोपं नाही.ती घरातील कामे करून सगळ्यांना चांगलंचुंगलं खाऊ घालते.घरातील प्रत्येक सदस्याची ती काळजी घेते.ती घरातील प्रत्येकासाठी उदार मनाने फुकटात राबत असते.नोकरी करणा-या स्त्रिला महिनाअखेर पगार मिळतो.पण गृहिणीला चोवीस तास राबूनही पगार मिळत नाही.तिला आठवड्यातून एकदाही कामातून सुट्टी मिळत नाही.सतत हसतमुख राहून ती सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असते.घराचे घरपण तिच्यामुळेच टिकून राहते.ती घरातील लक्ष्मी असते.घरातील अन्नपूर्णा असते.दिवसाची रात्र कशी होते हे तिला कामाच्या व्यापात कळतच नाही.सकाळपासून रात्रीपर्यंत कितीतरी व्याप तिला सांभाळावा लागतो.चहा, नाश्ता, जेवण बनवणे,भांडी घासणे, कपडे धुणे,केर काढणे,फरशी पुसणे…. बापरे बाप! किती कामे करते ती!
तिलाही वाटतं थोडावेळ कुठेतरी फिरून यावं.पण गृहिणी मात्र घरातील लोकांचाच जास्त विचार करीत असतात.गृहिणींना सकाळ झाली की स्वयंपाकाची चिंता असते आणि रात्रीही काय स्वयंपाक करायचा या विचारात ती असते.रात्री स्वयंपाक झाला की सकाळच्या स्वयंपाकाची तिला चिंता असते.त्यासाठी ती दुसऱ्या दिवसाची प्राथमिक तयारी करून ठेवते.कधीकधी मुलांना आणि नव-याला वेगवेगळी भाजी करून द्यावी लागते.कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी तिला जपाव्या लागतात.यात मात्र ती स्वतःच्या आवडीनिवडी बाजूलाच ठेवते.
कामाच्या रहाटगाडग्यातून तिला सुटका नाहीच.काही गृहिणींना घरचे लोक टोमणे मारत असतात.तू दिवसभर घरातच असते.कोणता मोठा तीर मारते? सर्वांसाठी तू तेवढेही करू शकत नाही का? गृहिणी घरातील कुणाची तरी आई,आजी, बायको, मावशी असते.घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती वेळेवर सर्व करत असते.मुलांवर योग्य संस्कार करते.सर्वांचे आरोग्य सांभाळते.घरी आलेल्यांचे आदरातिथ्य करते.एवढे करूनही ती घरच्यांकडून कुठलीही अपेक्षा करत नाही.फक्त घरच्यांनी तिला थोडं समजून घ्यावं इतकीच तिची अपेक्षा असते.तिच्याही मनाचा विचार घरच्यांनी करायला हवा.तिच्या मनाचा कोंडमारा होऊ नये याची आणि तिच्या आरोग्याची काळजी घरच्यांनी घ्यायलाच हवी.कधी तिला कुठे फिरायला घेऊन गेले पाहिजे,कधी तिच्या आवडीची खरेदी तिला करू दिली पाहिजे.तिला कामाचा ताण आला की थोडी चिडचिड तीही करते जे अतिशय स्वाभाविक आहे.शेवटी तीही एक हाडामासाची माणूस आहे.तिलाही मन आहे,भावना आहेत.घरच्यांनी तिला समजून घेणे गरजेचे आहे.ती घरातील लोकांसाठी आपल्या आशा आकांक्षाचा त्याग करते.तिला घरातील लोकांच्या प्रेमाची, मायेची गरज असते.कधी ती घरच्यांसाठी काहीतरी चांगले जेवण बनवले तर घरातल्यांनी तिचे कौतुक नक्की करायला हवे.त्यामुळे तिला कुटुंबातील सदस्यांकडून खूप मोठा मानसिक आधार मिळत असतो.स्वत: च्या जीवनाचा त्याग करून ती घरातील सर्वांच्या सेवेत तत्पर असते.काही गृहिणी घरातील पुरुष मंडळींना काहीच कामे सांगत नाहीत जे अगदी चुकीचं आहे.घरातील पुरूषांना देखील थोडीफार कामे सांगायला हवी.तिला घरातील पुरुषांनीही कामात मदत करायला हवी.त्यामुळे तिच्यावरचा कामाचा ताण थोडा हलका होण्यास मदत होईल.परदेशात पुरूष कितीतरी घरातील कामे करीत असतात.आपल्याकडील पुरूषांनी,मुलांनी तिला घरकामात मदत केली तर बिघडतं कुठे?मुलांनीही घरातील लहानसहान कामे केली तर त्यांना काम करायची सवय लागते.पुढे ते शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेरगावी किंवा विदेशात गेले तर ही सवय त्यांच्या कामी येते.
गृहिणींचे काम तर नेव्हर एंडींग असतं असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गृहिणी असणं म्हणजे अतिशय जवाबदारीचं काम आहे.गृहिणी असणं हे लाज वाटण्याचे नाही तर अत्यंत अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे.गृहिणी चार भिंतींना घर बनवते.कुठल्याही गृहिणीने आपण गृहिणी असल्याचा अभिमान बाळगावा.आज ‘गृहिणी’ या पदाला एक प्रोफेशन म्हणून समाविष्ट करते.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleमाहोरा येथे पाण्याची समस्या दूर होणार ? “अखेर टँकर झाले सुरू’
Next articleखोटे गुन्हे मागे घ्या अन्यथा सकल मराठा समाज तीव्र आंदेलन करणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here