Home सामाजिक आमलकी एकादशीचे व्रत – कथा आणि महत्व

आमलकी एकादशीचे व्रत – कथा आणि महत्व

96
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_080550.jpg

आमलकी एकादशीचे व्रत – कथा आणि महत्व
(आज बुधवार, दि. २० मार्च २०२४)

🔶आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिक महिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. प्रत्येक एकादशीचे विशेष महत्व आहे. त्यातील एक म्हणजे आमलकी एकादशी होय.

आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे, देवांमध्ये श्रीहरी नारायणजींना श्रेष्ठ स्थान आहे. तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झालेले आहे. नारायणजींनी सृष्टी रचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली. तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला. आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे.

व्रत कथा –
कुंतीनंदन विजया एकादशीचे महात्म ऐकून आनंदित होते. धन्य होत होते. विजया एकादशीचे महात्म ऐकल्यावर कुंतीनंदन भगवान श्रीकृष्णांना विचारतात फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशी चे काय महात्म आहे? कुंतीनंदन खूप विनम्रतेने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारतात. त्यांची विनंती ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कुंतीनंदन, या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. या व्रताची एक प्राचीन कथा आहे, ती मी आपणास सांगतो. ती शांत पणे ऐका.
प्राचीन काळी महान राजा मान्धाताने वसिष्ठ ऋषींना प्रश्न केला की, महर्षीजी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल. महर्षी वसिष्ठजी बोलले – हे राजा सर्व व्रतांमध्ये उत्तम जे शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आमलकी एकादशीचे व्रत होय. राजा मान्धाता बोलले – महर्षीजी मला सांगा या आमलकी एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली? हे व्रत कसे करतात.
महर्षी वसिष्ठजी बोलले – हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो. हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते. या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात. या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे. आमलकी म्हणजे आवळा यांची उत्पत्ती हि भगवान विष्णूच्या मुखातून झाली. मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो ती ऐका.
प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते. त्या नगरात ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र या चारी वर्णातील लोक फार प्रसन्न पूर्वक राहत होते. या नगरात नेहमीच वेदांचे पठण होत असे. त्या नगरात कोणीच पापी, दुराचारी, नास्तिक असे कोणीच नव्हते. नगरामध्ये चैत्ररथ नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करीत होते. ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते. त्या राज्यातील प्रजा ही विष्णू भक्त होती. तेथील लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते.
एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात आमलकी नावाची एकादशी आली. त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंद पूर्वक एकादशीचा उपवास केला. राजाने आपल्या प्रजे बरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली व धूप, दीप व नैवेद्य यांनी पूजा करीत होते. त्यांनी आवळा वृक्षाचे पण पूजन केले. त्यांची स्तुती केली व प्रार्थना केली की, माझ्या सर्व पापाचा सर्वनाश करा. त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले. त्याच रात्री तेथे एक शिकारी आला. तो महापापी व दुराचारी होता.
आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करून करत असे. त्या शिकाऱ्याला फार भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता. तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता. त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रत कथा व महात्म ऐकत होता. या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांसोबत जागरण करून काढली. सकाळी सगळे आपआपल्या घरी निघून गेले. शिकारी पण घरी गेला व जेवण केले. काही दिवसाने त्या शिकाऱ्याचा मृत्यु झाला. तो फार पापी होता. त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी न कळत त्याच्या कडून एकादशीचे व्रत, उपवास व जागरण झाले होते. त्यामुळे त्याचे सर्व पाप नष्ट झाले होते व त्याला पुण्याची प्राप्ती झाली होती.
त्याला पुढील जन्म देण्यात आला. त्याचा राजा विदुरथच्या घरी जन्म झाला. त्यांचे नाव वसुरथ असे ठेवण्यात आले. वसुरथ पुढे तिथला राजा बनला व तेथे चांगल्या प्रकारे राज्य केले. त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्या प्रमाणे होते, त्याची कांती चंद्रा प्रमाणे, क्षमेची प्रवृत्ती पृथ्वी प्रमाणे होती. तो अत्यंत धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर आणि विष्णु-भक्त होता. तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे. रोज दान धर्म करत असे.
एकदा राजा वसुरथ शिकार करण्या करता गेला. त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रास्ता भटकला. तेथेच एका झाडाखाली तो झोपला. काही वेळाने तेथे डाकू आले. राजाला एकटे पाहून ते ओरडत होते, मारा याला मारा. या राजाने आपल्या वडील, आजोबा व इतर भाऊ बांधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले. आता आपण याला मारून बदला घ्यायला पाहिजे. एवढे म्हणून डाकू राजाला मारू लागले.
डाकू अस्त्र -शस्त्राने राजा वर वार करीत होते. परंतु ते अस्त्र-शस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत होते व राजाला फुलांप्रमाणे जाणवत होते. देवाच्या कृपेने डाकूंचे अस्त्र-शस्त्र हे त्यांचेच त्याच्या वर उलट प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले. तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातलेले होते. त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघू पाहत आहे असे.
तेव्हा त्या मृत्यूच्या देवी प्रमाणे दिसत होत्या. त्यांनी काही क्षणातच त्या सर्व डाकूंचा वध केला. राजा जेव्हा झोपेतून उठले त्यांनी पहिले की त्यांच्या आजू बाजूला कित्येक डाकू मरून पडले आहे. ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले? कोणी जवळचा व्यक्ती तर नव्हे? हे विचार करीत असतांना आकाश वाणी झाली की भगवान विष्णूजींच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार. ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूचे स्मरण करत त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत सुखरूप आले. वशिष्ठ ऋषी बोलले – राजा हा सर्व आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जो कोणी आमलकी एकादशी चे व्रत करतो, तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो व शेवटी वैकुंठ धाम प्राप्त करतो.

सौ प्रिया गाडे
येवला तालुका महिला वारकरी मंच
विठ्ठल नगर येवला

Previous articleयुवकक्रांती महाआघाडीने विरोधकांना फटकारले.
Next articleसराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तासभरात पकडले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here