आशाताई बच्छाव
०३ लाख रुपये देऊन लग्न केले ; दोन महिन्यांतच नवरी घर सोडून पसार
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड/आष्टी दि: ०९ तालुक्यातील ३४ वर्षीय तरुणाचे लग्न होत नसल्याने मध्यस्थी महिलेने एक मुलगी दाखवली. मात्र लग्नासाठी ०३ लाख रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. मुलाने ०३ लाख रुपये देऊन लग्न केले. मात्र अवघ्या दोनच महिन्यांत नवरी घर सोडून प्रसार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवाने आष्टी पोलीस ठाण्यात नवरीसह तिची बहीण, मध्यस्थी महिला आणि एका पुरुषावर गुन्हा दाखल केला आहे.
आष्टी तालुक्यातील चिखली येथील एका ३४ वर्षीय तरुणाचे लग्न होत नसल्याने त्याने एका मध्यस्थी महिलेच्या माध्यमातून लग्नासाठी स्थळ निवडले. पण लग्न लावण्यासाठी ०३ लाखाची मागणी करण्यात आली. ०३ लाख रुपये दिल्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोन महिने नवरी घरी राहिली. पण त्यानंतर जानेवारीमध्ये नवरी अचानक पसार झाली. मोबाईल फोनवर संपर्क साधल्यावर चार, आठ दिवसात येते, असे कारणे दाखवून येणे टाळत होती. दरम्यान नवरीचा मोबाईल फोन बंद आढळून आला. दुसरा कुठला संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. यामुळे आष्टी पोलीस ठाणे गाठून तरुणाने सोलापूर येथील नवरी व बहीण – दाजी आणि मध्यस्थी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे पुढील तपास करीत आहेत.