आशाताई बच्छाव
तृणधान्याचा आहारात उपयोग करणे गरजेचे – सोनकांबळे एम .जी.
देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)
देगलूर :-राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने देगलूर महाविद्यालय देगलूर येथे तृणधान्य व त्यापासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शन वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने भरविण्यात आले होते त्याप्रसंगी देगलूर तालुका कृषी अधिकारी एम.जी. सोनकांबळे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ हे होते तर उपप्राचार्य डॉ. ए .बी . चिद्रावार, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एच. एम .लाकडे, डॉ. के .बी. नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात थोर शास्त्रज्ञ सी. व्ही .रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
पुढे बोलताना कृषी अधिकारी म्हणाले की आज रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे पिकांची हानी होत आहे व त्यापासून मिळणारे अन्न हे सकस राहिले नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊन वेगवेगळ्या रोगांना आपण बळी पडत आहोत. परंतु जर आपण आपल्या आहारात तृणधान्याचा समावेश केला तर आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होईल. या प्रदर्शन प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या तृणधान्यापासून बनविलेल्या पदार्थांची माहिती सादर केली. वेगवेगळ्या दहा तृणधान्याचा समावेश या प्रदर्शनात करण्यात आला होता व त्याची शास्त्रोक्त माहिती पाहुण्यांना विद्यार्थ्यांनी करून दिली एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पदार्थांचा आस्वादही पाहुण्यांनी घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असे उपक्रम महाविद्यालयात होणे गरजेचे आहे असेही प्रतिपादन सोनकांबळे एम.जी. यांनी केले.
अध्यक्ष समोर करताना प्राचार्य डॉ. खताळ यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करा. अपयशाने खचून न जाता व यशाने हुरळून न जाता आपले पाय कायम जमिनीवर असावेत व वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी व्हा असा मौलिक संदेश दिला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एच. एम.लाकडे यांनी केले तर आरती बामणे हिने सुरेख संचलन केले . निकिता शेट्यी हिच्या आभारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.






