आशाताई बच्छाव
कथा – स्नेहबंध
आज आरतीला ऑफीसमधून निघता निघता रात्रीचे दहा वाजले.काही महत्वाचं काम असल्यामुळे तिला थोडं जास्त वेळ थांबून काम संपवावं लागलं.बाहेर पावसाची रिपरिप चालूच होती.तिचे घर ऑफीसपासून बरेच लांब होते.त्यामुळे तिला घरी जायला बराच वेळ होणार होता.तेवढ्यात तिने बोलवलेली कॅब आली.कॅबच्या मागच्या सीटवर ती बसली आणि तिने आपल्या लॅपटॉपवर फेसबुक उघडले.फेसबुकवर लाॅगिन करताच तिच्या मित्र- मैत्रिणींनी शेयर केलेले कितीतरी फोटो तिच्या नजरेस पडले.फेसबुकवरील बर्थडे आणि काही पार्टीचे फोटो पाहून तिला वाटले की आपण कामाच्या व्यापात सगळ्यांना पार विसरून गेलो आहोत.अचानक तिची नजर मॅसेज बाॅक्सवर पडली.मनोजचे खूप सारे मॅसेजेस होते त्यात.
तीन महिन्यांपूर्वी तिचे आणि मनोजचे कसल्यातरी कारणावरून जुजबी भांडण झाले होते.त्यानंतरही मनोजने तिला फेसबुकवर अनेक मॅसेजेस पाठवले,परंतु आरतीने ते मॅसेजेस पाहिलेच नाही.मनोजचा शेवटचा मॅसेज दोन आठवड्यांपूर्वी आला होता.त्यात त्याने फक्त ‘ आरती ‘ असे लिहिले होते.मनोजने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे खूप सारे फोटो टाकले होते.आरती त्या फोटोंकडे बघून एकीकडे खुश होत होती,पण दुसरीकडे तिला मनोजचा रागही येत होता.तिला वाटत होते की मनोजने तिला पुस्तक प्रकाशनाचे साधे आमंत्रणही दिले नाही.पावसाची गती हळूहळू वाढत चालली होती आणि कॅब तिच्या घराच्या दिशेने पळत होती.
कॅबमध्ये बसल्या बसल्या आरती विचार करत होती की मनोजने असे कसे तिला टाळून पुस्तकाचे प्रकाशन केले?तो तर पुस्तकाची पहिली प्रत तिला देणार होता.आजपर्यंत तिच्या मनाप्रमाणे वागणारा मनोज अचानक बदलला कसा याचे तिला आश्चर्य वाटले.इतक्यात कॅब तिच्या इमारतीसमोर येऊन थांबली.” मॅडम,तुमचे घर आले.” कॅबवाल्याच्या आवाजाने ती भानावर आली.आता पावसाचा जोर चांगलाच वाढला होता.आरतीने कॅबवाल्याचे पैसे दिले आणि ती तिच्या घराच्या दिशेने निघाली.पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी ती धावत तिच्या इमारतीत शिरली.इमारतीचा गार्ड आरतीला म्हणाला -“मॅडम, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं आहे.तिकडे कॅफेटेरिया मध्ये बसले आहेत.खूप वेळेपासून तुमची वाट बघत आहेत.” ” कोण आहे? नाव काय सांगितलं?” आरतीने गार्डला प्रश्न केला.” नाव तर नाही विचारले मी” गार्डने उत्तर दिले.आरतीला मात्र अंदाज होता की तो मनोजच असेल.तिची वाट पाहणारा दुसरा- तिसरा कोणी नसून मनोजच आहे याची तिला खात्री होती.तिचे मन आनंदाने नाचू लागले.तिला वाटू लागले की तिची कुठलीतरी हरवलेली वस्तू परत मिळाली आहे.
‘ आरती…….’ अचानक आलेल्या मनोजच्या आवाजाने ती आनंदीत झाली.हा आवाज ऐकायला ती आतुर झाली होती.” कसा आहेस मनोज?”आरतीने प्रश्न केला. मनोजने हसत उत्तर दिले -“मी नेहमीसारखाच आहे गं!तुला मी माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ‘चीफ गेस्ट’ म्हणून आमंत्रण द्यायला आलो आहे.रविवारी कार्यक्रम आहे आणि तुला यावच लागेल.” “पण तू जे फेसबुकवर पुस्तकाच्या उद्घाटनाचे फोटो टाकले होते त्याचे काय?” आरतीने मनोजला प्रश्न विचारला.
” अगं,ते तर रिहर्सल होतं.पहिल्या पुस्तकाचे उद्घाटन तुझ्याशिवाय कसं होणार?” मनोज हसत म्हणाला.आता आरतीला आपले अश्रू आवरणे कठीण झाले.तिला सर्व एका स्वप्नाप्रमाणे वाटत होते.
” आरती, खूप रात्र झाली आता.मला निघायला हवं.” आरतीने हो म्हणत मान हलवली.आरतीचा निरोप देऊन मनोज इमारती बाहेर उभ्या असलेल्या आपल्या कारमध्ये बसून निघून गेला.त्याची पाठमोरी आकृती ती बघत असताना मनात सुखावत होती.ती मनात पुटपुटली -‘ मी उगाचच मनोजवर नाराज झाले होते.तो खरच खूप चांगला आहे.’
लैलेशा भुरे
नागपूर