आशाताई बच्छाव
मराठी साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी
अनेक पवित्र तीर्थ क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत. अनेक धार्मिक ग्रंथ रामायण, महाभारत, गीता, कुराण, बायबल असे एक नाही तर अनेक धार्मिक ग्रंथ महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मिळाले आहे. हे खरंच खूप वंदनीय आहे. संस्कृतमधील वाचन सरावामुळे आपले उच्चार खूप सुस्पष्ट होतात. असा सर्वांगीण विकास करणारे अमर साहित्य आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास लाभले आहे. ते खरंच आपले नशीब म्हणावं लागेल. प्रत्येक नागरिकाने या धर्मग्रंथात असणारी शिकवण आचरणात आणून त्याचे संस्कार मुलांवर करण्याचे कर्तव्य बजावणे खूप खूप आवश्यक आहे. असा रीतीने आपण मराठीबद्दल प्रेम, आवड निर्माण करू शकतो.
मराठी साहित्य खूप विस्तीर्ण आहे. त्या साहित्याची आवड आपण मुलामध्ये निर्माण करायला हवी, त्यामुळे सतत वाचनास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सर्व भावी पिढीची पाऊले आपण मोबाईल दुकानाकडे न वळवता ती ग्रंथालयाला वळली पाहिजे. अशी प्रतिभा, प्रतिबिंब मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, मराठी संस्कृतीचा जबरदस्त ठसा त्यांच्या मनावर बालपणीच रुजला गेला पाहिजे. असे ठसे उमटले की खूप मराठीप्रेमी आपणास निश्चितच पाहायला मिळणार आहेत.
आपले भविष्य आपल्याच हातात असते या उक्तीनुसार आपला महाराष्ट्र आपल्याला मराठीकडे वळवायचा की इंग्लिशकडे हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. मराठीकडे जर पाऊले वळली तर नक्कीच सर्व जन सुसंस्कृत आणि संस्कारी निर्माण होतील, यासाठीच आपण प्रत्येकाने थोडसे जागरूक असणे गरजेचे आहे. गड किल्ल्यांच्या सतत सहली काढून त्यांना सतत त्याची इतिहासातील माहिती जाणीवपूर्वक सांगितली पाहिजे. अश्यामुळे मुलांना इतिहास कसा होता याची परिपूर्ण माहिती मिळेल. आणि ती चिरकाल स्मरणात राहील.
सौ उमा (जयश्री) चव्हाण
आदर्श शिक्षिका – छत्रपती शिवाजी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय वनसगाव