आशाताई बच्छाव
रावळगाव चॉकलेट आता पुन्हा गजबजणार “पान पसंद” ची चव पुन्हा चाखायला मिळणार…!
(राजेंद्र पाटील राऊत)
रावळगाव दि.१०, स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेला नाशिकच्या रावळगावातील चॉकलेट कारखाना पुन्हा गत वैभवाच्या पाऊलखुणा जोपासत सुरू होणार असल्याने आता परत एकदा “पान पसंद”चॉकलेट सह विविध प्रकारच्या रावळगाव गोळ्यांचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या रावळगाव येथे वालचंद हिराचंद यांनी रावळगाव साखर कारखान्या सोबतच रावळगाव चॉकलेटची निर्मिती केली होती,या गोळ्यांमध्ये पान पसंद, मँगो,आदिसह विविध प्रकारच्या गोळ्यांनी एकेकाळी संपूर्ण देशासह परदेशातही आपला नावलौकिक वाढविला होता तर या रावळगाव गोळयांची दुरदर्शनवर देखील खास जाहिरात चालविली जात होती.मात्र नंतरच्या काळात रावळगाव येथील साखर कारखाना सोबतच गोळी कारखान्याला पण उतरती कळा लागल्याने रावळगाव चॉकलेट पण आठवणीलाच राहिल की काय? असे जाणवत असतानाच,आता पुन्हा रावळगाव गोळयांना गतवैभव प्राप्त होऊन रावळगावचे नाव पुन्हा सर्वत्र गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रिलायन्स ग्रुपचे अनिल अंबानी यांनी आता रावळगाव चॉकलेट कारखान्यांची मालकी २७ कोटी रुपयांना विकत घेतल्याने भविष्यात लवकरच गोळ्यांची चव चाखता येणार असली तरी या उद्योगामुळे रावळगावला परत गतवैभव प्राप्त होईल अशीच चिन्हे सध्या दिसून येत आहेत.