आशाताई बच्छाव
ब्राह्मण समाजाच्या आंदोलनास मराठा योद्धा जरांगे यांनी दिली भेट
माजी मंत्री टोपे, आ. राजेश टोपे यांच्यासह विविध मान्यवरांनी दिल्या भेटी
जालनाः(दिलीप बोंडे)-ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे म्हणून गत चार दिवसांपासून ब्राह्मण समाजसेवक दीपक रणनवरे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणास शुक्रवारी दुपारी मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी वेळातवेळ काढून ब्राह्मण समाजाच्या आंदोलनस्थळी भेट दिली. प्रचंड अशा जनसमुदायातून जरांगे यांनी वाट काढून रणनवरे व समाजबांधवांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली. दरम्यान, शुक्रवारी माजीमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन पूर्णपणे पाठिंबा असल्याचे सांगून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
खोतकर व टोपे यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. रणनवरे यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून, शेकडो बांधवांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. अनेक समाजबांधव स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावत आहेत. विविध जाती, समुहाच्या वतीने पाठिंबे दिले जात आहेत.
शैलेश घुमारे यांनी दिला पाठिंबा
युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष शैलेश घुमारे यांनी शुक्रवारी आंदोलनकर्ते दीपक रणनवरे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र दिले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी तसेच शैलेश घुमारे मित्रमंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रणनवरे यांची आरोग्य तपासणी
अन्नत्याग करणारे मुख्य आंदोलक दीपक रणनवरे यांची शुक्रवारी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रकृतीचा आढावा घेतला. यावेळी सामान्य रूगणालयाचे वैद्यकीय पथक उपस्थित होते.