आशाताई बच्छाव
चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीट मध्ये 415 हेक्टर शेती बाधित….
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील काही भागात दिनांक 26/11/2023 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा पिकासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. दि 27 रोजी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची तहसीलदार प्रशांत पाटील चाळीसगाव यांनी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह पाहणी केली.
चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र दे, काकडणे, नांद्रे, तमगव्हाण या भागामध्ये झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामातील शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये मुख्य कांदा पिकाचे नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रशांत पाटील यांनी मंडळ अधिकारी गणेश लोखंडे व चेतन देवरे तलाठी तळोदे प्र.दे, कृषी सहाय्यक सानप आणि स्थानिक कोतवाल कर्मचारी यांच्यासह शेतावर जाऊन समक्ष पाहणी केली.
अनेक नुकसान ग्रस्त शेतकरी यांचेशी संवाद साधून त्यांना धीर देण्यात आला. यावेळी तहसीलदारांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. नुकसानीच्या प्राथमिक अंदाजानुसार एकूण अंदाजे बाधित शेतकरी संख्या 575,
अंदाजे बाधित क्षेत्र अंदाजे 415 हेक्टर असून याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवण्यात आला आहे. गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीबाबत स्थानिक कृषी सहाय्यक आणि तलाठी , ग्रामसेवक यांनी संयुक्त पंचनामे करून नुकसानी बाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केला जाणार आहे. पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.