आशाताई बच्छाव
चारशे पोलिस मराठा युवकांना मारण्यासाठीच आणले होते का?
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांचा खा. चिखलीकरांना सवाल!
लोहा/प्रतिनिधि
अंबादास पाटिल पवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण मराठवाड्यात मोठे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. अनेक मराठा युवक आत्महत्या करीत आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ नयेत असे आवाहन करण्यात आले असताना देखील मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम काहीजण करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या खासदारांनी चारशे पोलीस आणून भूमिपूजनाची हौस भागवून घेतली. मराठा आंदोलन दडपण्यासाठी व युवकांना मारण्यासाठी हा पोलीस बंदोबस्त लावला होता का? असा सवाल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर जोडण्याच्या
कामाचा शुभारंभ खा. प्रताप पा चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. मराठवाड्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी सर्वच राजकीय सोहळे रद्द केले आहेत. आंदोलनास समर्थन देत या भागाचे खा. सुधाकर श्रृंगारे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली पण भाजपश्रेष्ठींना मर्दुमकी दाखविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी हा कार्यक्रम करण्याचा अट्टाहास केला आहे
मराठा समाजाच्या युवकांबद्दल खा. चिखलीकर यांची पूर्वीपासूनच द्वेषाची भावना आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पहिल्यांदा
जेव्हा आणला.
तेव्हा मराठा युवकांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मिरवणुकीत लाठीचार्ज केला आणि आता मराठा युवकांचे आंदोलन सुरु असताना मागील दोन दिवसांपासून उपोषणकर्त्यांना महसूल व पोलीस प्रशासनाकडून दडपशाही मार्गानि बोलावून घेऊन त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहेत. हे सर्व . प्रकार खासदारांच्या हट्टावरून होत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारे खासदार आज समाजाच्या युवकांच्या जीवावर उठले आहेत, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.