आशाताई बच्छाव
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांचे शांतता, सलोख्याचे आवाहन
जालना, (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) :- मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा पुनरूच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा, शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी (ता. अंबड) येथे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या ग्वाहीनंतर श्री. जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. श्री. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन श्री. जरांगे पाटील यांच्या पाठीवर हात ठेवला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी श्री. जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलकांच्या बहुतांश मागण्यांबाबत शासन ठोसपणे कार्यवाही करत असल्याची माहिती दिली. तसेच सारथी आणि आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्याबाबत करण्यात आलेल्या मागण्यांवर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे जाहीर केले.
याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.