आशाताई बच्छाव
जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या!
– डॉ.श्रीमंत कोकाटे
राजमाता जिजाऊमाँसाहेब या केवळ शिवरायांच्या माता एवढीच मर्यादित ओळख नाही, जसे त्यांनी शिवरायांना घडविले, तसेच नातू संभाजीराजांना देखील घडविले. आपले क्रांतीकारक पती शहाजीराजे यांच्या महत्त्वकांक्षी आणि शौर्यशाली कार्य कर्तृत्वाला तशीच खंबीरपणे साथ दिली. प्रजेला अत्यंत मायेने वागविणार्या त्या स्वराज्याचा आधारवड होत्या. जिजामाता या हिम्मतवान, कर्तृत्वान आणि बुद्धिमान होत्या. बालपणापासूनच त्या तलवारबाजी, प्रशासन, घोडेस्वारी आणि युद्धकलेत निपूण होत्या. वडील लखुजीराजे आणि आई म्हाळसादेवी यांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता वाढविले. जिजाऊंनी आपल्या जीवनात अनेक दु:खद घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या, वडिल आणि भावांची देवगिरीच्या भरदरबारातील हत्या, दीर, पुत्र यांनी रणांगणावर लढता-लढता सोडलेले प्राण उघड्या डोळ्यांनी पाहिले, जिजाऊ या संकट समयी लढणार्या होत्या, रडणार्या नव्हत्या, अनेक संकट आली तरी त्या जाऊमेद झाल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, खचल्या नाहीत, तर त्या संकटाला सामोरे जाणार्या धैर्यशाली होत्या.
त्यांनी बालशिवबाला मांडीवर बसवून खेड शिवापूर येथे न्यायनिवाडा केला, अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्याय दिला, महिलांवर अन्याय अत्याचार करणार्या नराधमांना शिक्षण ठोठावल्या, जिजाऊ करारी, स्वाभीमानी, न्यायनिष्ठूर, लढवय्या होत्या, तशाच त्या संवेदनशील आणि कनवाळू मनाच्या होत्या. आपल्या राज्यातील प्रजा सुखी असली पाहिजे, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांचे स्वत:चे गुप्तहेर खाते होते, त्यामार्फत त्या शिवबाला सतत सतर्क करत असत, तसेच त्या उत्तम न्यायाधीश होत्या. पूर्वी दिलेले अन्यायी निवाडे त्यांनी फिरवून पुन्हा योग्य न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले.
शिवाजीराजे जेव्हा पन्हाळा किल्यावर सिद्दी जोहरच्या वेढ्यात अडकले होते, तेव्हा जिजाऊंनी हातात तलवार घेतली, घोड्यावर बसल्या आणि राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या, त्याप्रसंगी त्या म्हणतात “आता जाते आणि त्या सिद्दीला ठार करून शिवबाला सोडवून आणते” या प्रसंगाचे रसभरित वर्णन समकालीन कविंद्र परमानंदाने ‘शिवभारत’ या ग्रंथात केलेले आहे.
यावरून स्पष्ट होते की, जीवघेण्या प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत बसणार्या, नव्हत्या तर हातात तलवार घेऊन रणांगण गाजविणार्या शूरवीर होत्या. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता, पण भाबडेपणाने पूजा अर्चा करण्यात त्यांनी संकटसमयी वेळ दौडला नाही.
शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले पण स्वराजाचा आधारवड प्रेरणा, जिजामाता होत्या. त्यामुळेच शाहीर अमर शेख जिजाऊबद्धल लिहितात.
‘आला आला शिवाजी आला।
योग्य समयाला। जिजाऊन दिला॥
थोर त्या आईचे उपकार।
थोर त्या मानेचे उपकार॥
मराठ्यांनो तुमच्याने नाही फिटणार जी जी जी॥
जिजाऊंचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत, असे शाहीर अमर शेख लिहितात.
जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. सर्व जातीधर्मातील लोकांना अत्यंते मायेने-ममतेने आपुलकीने वाढविले. त्या काळात स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तिला ‘मावळा’ म्हटले जात असे. मावळाई या इंद्रायणी खोर्यातील प्राचीन काळातील मातृसात्तक महामातेच्या नावावरून ‘मावळा’ हा शब्द आला, असे प्राच्यविद्या पंडित डी.डी. कोसंबी म्हणतात. मावळा हा शब्द स्त्रीप्रधान संस्कृतीचा आदर करतो. तसाच तो शब्द भेदभाव बाळगत नाही. मावळा म्हणजे आपण सर्वजण. जिजाऊंनी मावळ्यांना आपुलकी, जिव्हाळा, आधार दिला.
शिवाजीराजेे आग्राकैदेत असताना स्वराज्य हिंमतीने राखण्याचे कार्य जिजाऊंनी केले. पतीनिधनानंतर सती न जाता, पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्या ग्रंथप्रामाण्यवादी किंवा अंधश्रद्धाळू नव्हत्या, म्हणूनच त्यांनी सतीप्रथा लाथाडली. ही मध्ययुगीन काळातील क्रांतीकारक घटना आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाला झालेला विरोध मोडून राज्याभिषेक पार पाडणे, यात जिजाऊंची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्या जशा राजकीय विरोधकांच्या विरूद्ध लढल्या तश्याच त्या सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरूद्ध देखील लढल्या.
जिजाऊ शूर, पराक्रमी, बुद्धिमान, निर्भिड, बुद्धिप्रामाण्यवादी, धैर्यशाली, महत्वाकांक्षी होत्या, तशाच त्या सुंदर होत्या असे, परमानंद लिहितो, त्या कुरूप असत्या तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला कमीपणा येत नाही. त्या रूपवान होत्या, असे समकालीन जयराम पिंडे म्हणतो. त्यामुळे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या सौंदर्याशी जिजाऊंच्या व्यक्तीमत्त्वाशी आधुनिक कवींनी केलेली तुलना अनैतिहासिक आणि विसंगत आहे, हे स्पष्ट होते.
शहाजीराजांच्या पदरी असणारा जयराम पिंडे जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन पुढील प्रमाणे करतो.
“जशी पंपकेशी खुले फुलजाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई॥
जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला।
करी साऊली माऊली मुलाला।
अर्थ-जिजाऊ शहाजीराजां सारख्या पराक्रमी पुरूषाला पत्नी म्हणून शोभून दिसते, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांची कीर्ती सर्व भरतखंडावर पसरलेली आहे. त्यांच्या कीर्तीच्या सावलीखाली सर्व सज्जन लोक आश्रयाला येतात.
अर्थात सर्वांना मायेची सावली देणार्या जिजाऊ होत्या. जिजाऊंच्या चरित्रातून आज आपण निर्भिडपणा, कणखरपणा, शौर्य, समता, न्यायीवृत्ती, बुद्धिप्रामाण्यवाद शिकावा, वंशाला दिवा फक्त मुलगाच असतो, असे नाही तर मुलगी देखील वंशाल दिवा असते.
दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा स्वतःचे स्वतंत्र राज्य असावे ही स्फूर्ती हतबल झालेल्या जनतेत जिजाऊंनी निर्माण केली.आपणही लढू शकतो, आपणही जिंकू शकतो आणि आपणही उत्तम राज्यकारभार करू शकतो ही स्फूर्ती भारतीयांमध्ये जिजाऊंनी निर्माण केली. त्यांनी दिलेली स्फूर्ती घेऊन मराठे पुढे अनेक वर्षे मोगालाविरूद्ध लढले. घराघरात शिवाजीराजे संभाजीराजेसारख्या विचारांची पिढी निर्माण करावयाची असेल तर घरोघरी जिजाऊसारख्या माता निर्माण होणे, गरजेचे आहे.
डॉ. श्रीमंत कोकाटे