आशाताई बच्छाव
मोठी बातमी! मुलांच्या तस्करीचे सर्वात मोठे रॅकेट उघड; भुसावळ येथून २९ तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका
जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
जळगाव: भुसावळ आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ५९ अल्पवयीन मुलांची आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने सुटका केली आहे. बिहारमधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकावर तर मनमाड येथे ३० मुलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पाच संशयित ताब्यात घेण्यात आल्याचे कळते. तर भुसावळ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद (पेठभाग वालवा मस्जीद, आस्ठा मस्जीद, आस्ठा जि. सांगली) असे आहे.
रेल्वे बोर्डाकडून आलेल्या संदेशावरून सुरक्षा दल लोहमार्ग पोलिसांनी बिहार मधून महाराष्ट्रातील मदरशात जाणाऱ्या २९ अल्पवयीन मुलांना दानापूर – पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या या ८ ते १५ वयोगटातील मुलांना भुसावळ रेल्वे स्थानकात मंगळवारी दुपारी उतरवण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मुलांनी मिरज मधील मदरशात नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. मुलांसोबत पोलिस निरीक्षक विजय घेरडे, निरीक्षक मीणा यांनी संवाद साधला. दरम्यान, या प्रकरणी एकाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनमाडला देखील अशाच पद्धतीने काही ३० मुलांची सोडवणूक करण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे. दानापूर – पुणे एक्स्प्रेसने पुण्यासाठी निघालेल्या ८ ते १५ वयोगटातील मुलांना मदरशात की अन्य कुठे घेऊन जाण्यात येत होते?, याची सुरक्षा यंत्रणेकडून चौकशी सुरू असल्याचे कळते. त्यानुसार मुले कुठून आली, कुठे जात आहेत याची माहिती संकलित करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार आहे.