आशाताई बच्छाव
मुख्यमंत्रिपदासाठी कुणी काय केले, खुलासा करणार; राऊतांवर गोमूत्र टाकून स्वच्छ करा : केसरकर
भास्कर देवरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
शिंदे गट मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता त्यांना अल्टिमेटम दिला आहे. मुख्यमंत्रिपदासाठी कुणी काय केले?, याचा खुलासा येत्या 2-4 दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे. असा कडक इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ते पुन्हा कोणता गौप्यस्फोट करून राजकीय भूकंप आणतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच संजय राऊत यांच्यावर गोमूत्र टाकून स्वच्छता करावे असा घणाघात देखील त्यांनी केला आहे. आज ते ठाणे दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दीपक केसरकर यावेळी म्हणाले, “तुम्हाला मुख्यमंत्रिपद हवंय का? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना केली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात अश्रू आले. एकनाथ शिंदे यांचा अपमान झाला. आपण शिवसेनेसाठी केलेल्या त्यागाची किंमत अशा रीतीने केली जात आहे याचे शिंदेंना वाईट वाटले.”
केसरकरांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता ठाकरेंना एकप्रकारे इशाराच दिला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी कुणी काय केले?, याचा खुलासा येत्या 2-4 दिवसांत मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून करणार आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका
संजय राऊत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते यावरून केसरकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. केसरकर म्हणाले, कलम 370 काढणे हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. भाजपने हा स्वप्न पूर्ण केलं. पण हे कलम रद्द करण्यास काँग्रेसने विरोध केला. 370 कलमाला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या लोकांना शिवसेनेच्या नेत्यांनी भेटणे हा बाळासाहेब ठाकरेंचा मोठा अपमान आहे. शिवसेनेत आम्ही बंड केलं. त्यानंतर आम्ही कुठेही जायचो तेव्हा गोमूत्र टाकून ती जागा स्वच्छता केली जायची. आता त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्यावर गोमूत्र टाकून स्वच्छता करावे असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.