Home नांदेड तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले घोगरवाडी सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले घोगरवाडी सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!

41
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0003.jpg

तर महाराष्ट्राच्या सिमेवर असलेले घोगरवाडी सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून ओळखले जाईल!

▪️कृषि अधिकाऱ्यांनी एक दिवस गावात देऊन
शेतकऱ्यांच्या मनात जागविला विश्वास
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 1 :- महाराष्ट्राच्या सिमेवर असलेल्या किनवट तालुक्यातील घोगरवाडी हे आदिवासी गोंड जमातीचे गाव. “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभिनव पथदर्शी उपक्रमामुळे या गावाच्या आत्मविश्वासाला आज नवी जोड मिळाली. निमित्त ठरले नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांचे घोघरवाडी गावात शेतकऱ्यांसमवेत संपूर्ण दिवसभर राहणे, त्यांच्या सोबत शेतशिवार फेरी करून पीक पद्धतीला समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरले. गावातील शेतीलापूरक ठरेल अशी पीक पद्धती लक्षात घेणे व शेतकऱ्यांना या बदलापर्यंत विचाराच्या जवळ आणणे हा उद्देश सफल करीत घोगरवाडी गावाने या उपक्रमातून सेंद्रिय हळदीचे गाव म्हणून आम्ही विकसित करू असा आत्मविश्वास निर्माण केला.

या गावातील शेतकरी पिढीच्या रिवाजानुसार कापूस व सोयाबीन या पिकावर अधिक भर देत आले आहेत. गावाच्या चोहुबाजुला डोंगर आणि झाडी. पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने पाण्याची पातळी ही बऱ्यापैकी या गावात चांगली आहे. निलगाय, हरण, रानडुक्कर यांच्या त्रासापासून व होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी त्यातल्या त्यात गावातील शेतकऱ्यांनी कापसाला जवळ केले. मात्र यातून आर्थिक गणित सावरेलच याची शाश्वती नाही. यापासून प्रवृत्त करून त्यांच्या हाती नवीन पीक पद्धती देणे, त्यांना अधिक उत्पादन घेता यावे यासाठी उच्च तंत्रज्ञानाची ओळख करून देणे हे आवश्यक होते. शासनाच्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत प्रत्यक्ष कृषि अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्यांना शेतीच्या विकासाचा आज नवा मार्ग गवसला.

ज्योतिराम पांडुरंग तुमराम या आदिवासी शेतकऱ्याच्या घरी चलवदे थांबले. तुमराम यांची चार एकर जमीन या गावात आहे. नवीन तंत्रज्ञान आम्ही आत्मसात करायला तयार असून शासनाने ज्या योजना दिल्या आहेत त्याचा अधिक डोळस वापर करू असे त्यांनी सांगितले. घोगरवाडी गावातील शिवार व येथील जमीन फलोत्पादनासाठी चांगली आहे. येथे सिताफळ, पेरू चांगल्या पद्धतीने पिकू शकतील. ज्यांना फलोत्पादन शक्य नाही त्या शेतकऱ्यांनी हळदी सारखे पीक उत्तम पद्धतीने घेण्यासाठी पुढे सरासवले पाहिजे. इथल्या जमिनीचा पोत चांगला असून सेंद्रीय खताच्या माध्यमातून या गावाला सेंद्रीय हळदीचे गाव म्हणून विकसीत करण्यात मोठा वाव असल्याचे रवीशंकर चलवदे यांनी सांगितले.

या भागात निलगाय, हरण, रानडुक्कर सारखे प्राणी शेतीच्या पिकांना हानी पोहोचवतात. हे लक्षात घेता वन विभागाच्या नियमानुसार शेत शिवाराच्या भोवताली मोठा चर करणे याबाबत शक्य-अशक्यता पडताळून पाहिली जाईल, असे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. येथे उष्णतेचे प्रमाण लक्षात घेता सौर ऊर्जा आणि ठिबक सारखे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी जवळ केले तर यात मोठा बदल साध्य करता येईल. याचबरोबर दुग्धव्यवसाय, बकरी पालन, कुक्कुटपालन याला मोठा वाव असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मनात नवा विश्वास निर्माण केला.

Previous articleमुखेड नपा प्रशासनाच्या वतीने इको फ्रेंडली गणेश उत्सव स्पर्धा पर्यावरण पुरक श्री स्थापनास बक्षीस मिळणार
Next articleपिंगळवाडे परिसरात गणपती उत्सवात सुरुवात.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here