आशाताई बच्छाव
1947 ला भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मालगुंड भंडारवाडा येथील चौकाला दिले गेले “स्वातंत्र्यचौक” नाव स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिनी जपल्या ऐतिहासिक आठवणी… रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड भंडारवाडा येथील चौकाला 1947 ला भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य चौक असे ऐतिहासिक नाव देण्यात आल्याने या ऐतिहासिक आठवणींना येथील भंडारवाडा स्वातंत्र्य चौकातील स्थानिक कार्यकर्त्यांनी उजाळा दिला आहे. 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मालगुंड भंडारवाडा स्वातंत्र्यचौक येथील स्वातंत्र्यचौक नवरात्र उत्सव मंडळ व क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन राष्ट्रीय झेंड्याला मानवंदना दिली.
यावेळी स्वातंत्र्य चौकातील सर्व शालेय विद्यार्थी अंगणवाडी विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ऐतिहासिक आठवणींमध्ये सहभागी झाले होते.
मालगुंड भंडारवाडा स्वातंत्र्यचौकातील “त्या” काळातील कालकथित जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा शिवराम सुर्वे उर्फ आंबुकर यांनी स्वतः विशेष पुढाकार घेऊन भारत देशाला १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाने प्रेरित होऊन आपल्या वस्तीतील ठिकाणला स्वातंत्र्य चौक असे नाव दिले होते. यावेळी सर्वच ग्रामस्थांनी कृष्णा शिवराम सुर्वे यांच्या सोबत एकत्र येऊन स्वातंत्र्याच्या आनंदाचा मोठा जयजयकार केल्याच्या आठवणी सांगितल्या जातात. या ऐतिहासिक आठवणींना आणि देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवानिमित्त मालगुंड भंडारवाडा येथील स्वातंत्र्य चौकातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 75व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न केला.
स्वातंत्र्य चौक येथील सर्व कार्यकर्त्यांकडून नवरात्र उत्सवामध्ये अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम केले जातात. तसेच क्रांतिकारकांच्या महान विचारांवर आधारित विविध चित्रांचे उपक्रम ही राबवले जातात. त्यामुळे स्वातंत्र्य चौक हे नाव सर्वत्र अजरामर आहे एकूणच स्वातंत्र्य चौकातील ऐतिहासिक आठवणींचा ठेवा जपला जात असतानाच आपल्या मालगुंड भंडारवाडा स्वातंत्र्यचौकातील कालकथित कृष्णा शिवराम सुर्वे यांच्या स्मृतींचे स्मरण कार्यकर्त्यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले.
तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला एकूणच 1947 पासून आजतागायत मालगुंड भंडारवाडा येथील स्वातंत्र्य चौक हे नाव प्रचलित असल्याने आता या ऐतिहासिक आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.