आशाताई बच्छाव
घर पडझडीची माहिती गोळा करून नुकसान भरपाई द्यावी.
जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांची मागणी
लाखनी/,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) :तालुक्यात मागील ३ दिवसापासून संततधार पाऊस व अतिवृष्टीने अनेक कच्च्या घरांची पडझड झाली असून नदी नाल्यांना आलेल्या पुराचे पाणी शेतजमिनीत शिरल्यामुळे धान पिकांचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने घर पडझडीचे तसेच धान पीक नुकसानीचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकामार्फत सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांनी केली आहे.
मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील पिंपळगाव , सावरी, व चिचटोला या गावातील अनेक घरांची व गोठ्यांची पडझड झाली असून त्यांचे पंचनामे करून त्यांना शासकीय मदत करण्यात यावी असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पिंपळगाव येथील पार्वता नारायण थेर, पियुष विनोद थेर, वामन जैराम भांडारकर, दौलत मोडकू कमाने, प्रल्हाद गणपत शिवणकर, तुळशीराम दूधराम शेंडे, शलिनी दुलीचंद कमाने तर सावरी येथील महेश साधू धांडे, रमेश मंगरू धांडे, यशवंत आत्माराम धांडे, गिता घनश्याम पडोळे, हरिभाऊ पांडुरंग चकोले, लिलाराम धोंडूराव बडघरे, बबलू धोंडूराव बडघरे, रामु धोंडूराव बडघरे व चिचटोला येथील रविदास किसन सार्वे, मनिराम धोंडू मेश्राम, गुनिराम धोंडू मेश्राम, अरविंद ताराचंद नेवारे, हिरामन काशिराम नेवारे, शोभा परसराम मोहतुरे, किशोर हरिभाऊ इस्कापे, किसन नारायण लाडे, विनोद संपत मेश्राम, ताराचंद काशिराम नेवारे व इंदुबाई फत्तू चेटुले यांचा घरांचा व गोठ्यांचा समावेश आहे.
तालुक्यात ८,९,१० व १३,१४,१५ ऑगस्ट रोजी झालेल्या संततधार पावसाने तालुक्यातील अनेक गावातील कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन काठालगत असलेल्या शेतजमिनीत पुराचे पाणी शिरले व धान पिकावर गाळाची माती जमा झाल्याने त्याच प्रमाणे तलावाच्या साठवण क्षमतेपेक्षा अधिक पाणी झाल्यामुळे तलावाचे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असून हेही पाणी धान शेतीत शिरल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले आहे. तालुका प्रशासनाने याची दखल घेऊन घर पडझडीची माहिती गोळा करून तथा धान पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी जि. प. सदस्या डॉ. मनीषा निंबार्ते यांनी केली आहे.