आशाताई बच्छाव
माझा पत्रकारितेतला पहिला गुरु माझी आई! “प्रोत्साहन देणारी आशाताई”
वाचकहो,
आज गुरुपौर्णिमा!त्यानिमित आपल्या गुरुचा सन्मान करणे आपले आद्यकर्तव्यच आहे.मला तर आजच्या दिनी फक्त एवढंच म्हणावेसे वाटते की,”आई माझा गुरु,आई कल्पतरु;सौख्याचा सागरु आई माझी” माझ्या पत्रकारितेतला माझा खरा गुरु ही माझी आईच आहे.लहानपणी घरी अठरा विश्व द्रारिद्र पण मला वाचनाची आवड खुपच मोठ्ठी!त्याकाळी आमच्या कौळाणेसारख्या गावात फक्त काही मोजक्याच श्रीमंत लोकांकडे पेपर वृतपत्र यायचे.आणि गावातून कधी कुणी मालेगांवला गेलेच तर तेवढा एखादा पेपर घेऊन यायचा.त्याकाळी माझ्यासारख्या लहानग्या पोराला पेपर वाचनाची भारी आवड.पण…ज्यांच्या घरी पेपर यायचा तेथे पेपर वाचायला जायचे म्हणजे अगोदर त्यांनी सांगितलेली त्यांच्या घरातील कामे करुन द्यायची मग कुठे तास दोन तासाने तो पेपर वाचायला मिळायचा.त्यामुळे साहजिकच घरी चिडचीड व्हायची,आई बोलायची “एवढा वेळ कुठे गेला होतास?” तर मजबुरीनेच सांगावे लागायचे.पेपर वाचायला गेलो होतो,त्यावर माझ्या आईचे परखड व रोखठोक मत असे होते की,दुसऱ्याच्या दारात काय पेपर वाचायला जातो.अशी काही तरी कारकिर्द कर….की,तुझाच पेपर लोकांनी वाचायला पाहिजे.आईचा आशिर्वाद पाठीशी असल्यावर मग मला काय पाहणे.वयाच्या अवघ्या पंधराव्या सोळाव्या वर्षी मी या ग्रामीण भागातला दैनिक सकाळ वृतपत्राचा सोबतच रामभूमी ,गांवकरी,लोकमत सारख्या वृतपत्राचा प्रतिनिधी झालो.पत्रकार म्हणून नाव वाढायला लागले म्हटल्यावर सर्वप्रथम या भागातील कौळाणे,व-हाणे,नगांव,मडकीपाडा,काळेवाडी,मुंगसे,व-हाणेपाडा सारख्या गावातील नागरिकांना रोजच्या रोज सकाळी वृतपत्र दिवस उगवण्याअगोदर पोहचविण्याची नैतिक जबाबदारी स्विकारुन या भागात पत्रकार म्हणून स्वतः चा जम बसविला.त्यानंतर काही काळ मुंबईच्या वृतपत्रांसाठी नाशिक जिल्हाप्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले.या सगळ्या प्रवासात मला प्रोत्साहन देऊन हिंमत व धाडस देणारी माझी व-हाणे ता.मालेगांव येथील मेव्हणबहिण हिचा मला मोठा आधार ठरला.काही काळ पत्रकारितेसाठी मुंबईतही घालवला.आणि सन १९९९ साली मालेगांवला येऊन क्राँईम विषयावरील साप्ताहिक मालेगांवचा बाजारहाट सुरु केले,बरेच वर्ष हे साप्ताहिक चालविले.आणि माझ्या गुरुचा अर्थात माझ्या आईचा साडी चोळी देऊन कौळाणे या गावात आईच्या जन्मगावातच तिचा माजी खासदार कै.हरिभाऊ शंकर महाले यांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानीत केले.पुढे साप्ताहिक मालेगांवचा बाजारहाट हे बिना जाहिरातीवर चालणारे वृतपत्र बंद करुन,२० आँक्टोबर २००३ रोजी युवा मराठा या साप्ताहिक वृतपत्रांची मुहूर्तमेढ रोवली.सुरुवातीच्या काळात अनंत कष्ट घेऊन युवा मराठाची वाटचाल “एकटा चलो रे”या न्यायाने सुरुच ठेवली.आणि त्यातच सोशल मिडीयाचा जमाना व इंटरनेटचे युग अवतरल्याने युवा मराठा वृतपत्रात आमूलाग्र बदल घडविण्यात आले.आणि आज युवा मराठा महाराष्ट्रात अव्वल नंबर स्थानावर आपला नावलौकिक कायम राखून आहे.युवा मराठा आँनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून दररोज २ लाख ५७ हजार वाचकांपर्यत पोहचण्याचा बहुमान युवा मराठाला लाभला.तर युवा मराठा यु-टूयूब चँनलच्या माध्यमातून हजारो दर्शक जोडले गेलेत.त्याशिवाय दर आठवडयाला पालघर येथून युवा मराठा वृतपत्राची पीडीएफ आणि प्रिटींग आवृती संपूर्ण महाराष्ट्रभर वितरीत होत आहे.अर्थातच हे सगळ युवा मराठाचे महाराष्ट्रातल्या वीस जिल्ह्यात कार्यरत असलेल्या प्रतिनिधीच्या अथक परिश्रमामुळे आणि योगदानामुळे शक्य झाले आहे.तरीदेखील मी एवढेच सांगू शकेन…आईच माझा खरा गुरु आहे..आईचे स्वप्न साकारु करु शकलो,तर या प्रवासातील दुसरा गुरु मेव्हणबहिण आशाताई बच्छाव हिच्या सततच्या प्रोत्साहनामुळे व वेळोवेळी दिलेल्या धीर,हिंमत व धाडसामुळे आज युवा मराठाचा नावलौकिक वटवृक्षात झालेला आहे.आजच्या गुरुपौर्णिमेनिमित माझी आई स्वर्गिय लक्ष्मीबाई पाटील राऊत यांच्या चरणी शत शत वंदन व सतत खंबीरपणे पाठीशी असणाऱ्या गुरुसमान आशाताईंना आजच्या गुरुपौर्णिमेनिमित खुप खुप शुभेच्छा!
राजेंद्र पाटील राऊत
मुख्य संपादक
युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड वेब न्युज चँनल महाराष्ट्र