आशाताई बच्छाव
‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविताना नियमांचे पालन करावे
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
बुलडाणा, : प्रत्येक नागरिकाच्या मानात देशभावना विकसित करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत येत्या काळात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविताना ध्वज संहितेमधील नियम आणि अटींचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांनी केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यातील हर घर तिरंगा आणि स्वराज्य महोत्सव या उपक्रमाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती म्हणाले, गेल्या वर्षाभरापासून संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा हे उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरामध्ये देशाभिमान जागविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाचे संघटन करण्याची संधी आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यालयाने या उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा. शासकीय कार्यालयांनी त्यांना राबवावयाच्या उपक्रमांचे नियोजन करावे.
गेल्या वर्षभरात विविध उपक्रम राबवून राज्य हे या अभियानात अग्रेसर आहे. येत्या काळात हर घर तिरंगा हा उपक्रम दि. 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास, शिक्षण आदी विभागांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रत्येक घरावर झेंडा लावण्यासाठी 5 लाखांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात झेंडे उपलब्ध व्हावेत, यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाने नियोजन करावे. तसेच जिल्हा आणि तालुकास्तरावर 75 फुट उंच झेंडा उभारण्याचे निर्देश आहेत. हा उपक्रम राबविताना ध्वज संहितेमध्ये दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
हुतात्मा स्मारकांचे सुशोभिकरण, प्रदर्शने, विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक विभागांनी नियोजन करून सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांनी केले.






