राजेंद्र पाटील राऊत
भामरागड येथे माडिया महोत्सवाची उत्साहात सुरुवात.! गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आदिवासी समाज हा मानवी मूल्य जपणारा समाज असल्याचे मत व्यक्त केले. महिला पुरुष समानता या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही सगळी वैशिष्ट्ये या समाजाची ताकद असल्याचे मत माजी आमदार तथा भामरागड प्रकल्प स्तरिय आढावा समितीचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने तीन दिवसीय आदिवासी कला, क्रीडा व सांस्कृतिक ‘माडिया महोत्सव’ भामरागड आणि जिल्ह्यातील दुर्गम भागातील लोकांना संधी म्हणून आयोजित केला होता. यातून सर्वसामान्य आदिवासी युवकांना कला, क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखविणे सोपे जावे तसेच माडिया संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी म्हणून या उद्देशाने भामरागड माडिया महोत्सवाची सुरुवात झाली असून दिनांक २६ ते २८ मे पर्यंत विविध स्पर्धांच्या आयोजनातून त्याची सांगता होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन विभागीय आयुक्त माधवी खोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी पद्मश्री विजेते फोटोग्राफर सुधारक ओलवे, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. देवराव होळी, भामरागड प्रकल्प स्तरिय आढावा समितीचे अध्यक्ष डॉ नामदेवराव उसेंडी, जिल्हाधिकारी संजय मीणा, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अंकित, अतिरीक्त पोलीस अधीक्षक अनुज तरे, उपवनसंरक्षक आशिष पांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन आत्राम, तहसीलदार अनमोल कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाल्यावर उपस्थित अतिथींचे स्वागत आदिवासी पारंपारिक पद्धतीने तीर, कामठं व रेकी देऊन करण्यात आलं.
तीन दिवसीय माडिया महोत्सवामध्ये लोकनृत्य, रेला, पारंपारिक वेशभूषा, हस्तकला, पारंपारिक खाद्यपदार्थ इत्यादी स्पर्धा तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, नौकानयन, तिरंदाजी, गुलेल यासारख्या क्रीडा स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कार्यक्रम ठिकाणी बचत गटांचे विविध स्टॉल, साहित्य विक्री केंद्र, विविध योजनांची माहिती केंद्र लावण्यात आली आहेत. त्या ठिकाणी वनोपजापासून तयार केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ येणाऱ्या पर्यटक तसेच नागरिकांसाठी विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. परिसरात दुर्गम भागातील छायाचित्र प्रदर्शन लावण्यात आले आहे. महोत्सवामध्ये २५०० स्पर्धक, ३०० व्यवस्थापनासाठी असलेले अधिकारी कर्मचारी तसेच स्टॉल साठी आलेले दोनशेहून अधिक व्यावसायिक आहेत. तसेच पहिल्याच दिवशी हाजारो वेगवेगळ्या ठिकाणाहून नागरिकांनी भामरागड येथे भेट दिली.