राजेंद्र पाटील राऊत
शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांनी
स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीला दिलेले वचन पाळले
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्यूज)
मागील सात वर्षापासून महाराष्ट्र राज्यात भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात कोरोनामुळे पुन्हा शासनाने निर्बंध आणून भरती प्रक्रियेवर पूर्णपणे बंदी आणली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा युवकवर्ग पाच ते सहा लाख असून तो अक्षरशः हतबल झाला होता, मानसिक विवंचनेत जीवन जगत होता. मागील कालखंडामध्ये असंख्य युवकांनी महाराष्ट्रात आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यांचे दुःख पहावेना गेल्याने व कुठलाच पक्ष बाजू घेत नसल्याने यातच आशेचा किरण म्हणून अतुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. बळवंत शिंदे यांनी अथक परिश्रम घेऊन महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन या समस्येला वाचा फोडण्याचे काम केले व मागील काही दिवसापूर्वी नांदेड येथे शरदचंद्रजी पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे आले असता त्यांना निवेदन देऊन खोचकपणे प्रश्न करत विरोधी पक्षात असताना तुम्ही आमची सत्ता येऊ द्या आम्ही सर्व प्रश्न सोडवतो असे म्हणत होतात. मग आता सत्ता येऊन तीन वर्षे होत आहेत तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे तुमचे दुर्लक्ष का असा प्रश्न केला असता सर्व सन्माननीय नेत्यांनी आम्ही मुंबईत गेल्यागेल्या हा प्रश्न मंत्रीमंडळासमोर ठेवून नक्कीच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे वचन दिले. त्यावेळी स्पर्धापरीक्षा संघर्ष समितीच्या अध्यक्षांनी लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
वरील नेत्यांनी स्पर्धा परीक्षांच्या इशार्यामुळे 90 हजारांची भरती प्रक्रिया येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करून वित्त विभागाची बंदी उठवलेली आहे. त्यामुळे कुठे आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. संघर्ष समितीने विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावे व आपले स्वप्न साकार करावे अशा शुभेच्छा दिल्या आहेत आणि हे दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्यास लगेच संघर्ष समिती रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.
यावेळी अतुल रामदास यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रा. बळवंत शिंदे, उपाध्यक्ष रविराज राठोड, सचिव अॅड.प्रा. शिवाजी शिंदे, डॉ. साईनाथ, गोविंद तोटेवाड, अशोक तोटेवाड, बळवंत सावंत, अर्जुन ढोणे, अमोल देवसरकर, दीपक कदम, बालाजी हिप्परगेकर, गणेश ढगे, गोविंद उपासे, कैलास उपासे, ज्ञानेश्वर जिगळे, आनंद शिंदे, अभिजीत गजभारे, संभाजी लोहबंदे, प्रियांशू वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.