राजेंद्र पाटील राऊत
सर्व विभागातील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया त्वरित व पारदर्शक करावी.
स्पर्धा परीक्षा संघर्ष समितीची शरदचंद्रजी पवार व दिलीप वळसे पाटील यांना निवेदनाद्वारे मागणी
नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा आँनलाईन न्युज)
सद्यस्थितीतील महाराष्ट्र राज्यातील स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अतिशय मोठ्या प्रमाणात मानसिक गर्तेमध्ये अडकला असून प्रत्येक दिवशी मानसिक विवंचनेत जीवन जगत आहे. मागील कालखंडामध्ये स्पर्धा परीक्षा तयारी करणार्या विद्यार्थ्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण पाहता ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावणारी आहे. शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पुढील काही महिन्यांमध्येच आत्महत्येची श्रंखला महाराष्ट्रभर चालेल आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काळिमा फासणार्या घटना घडतील आणि महाराष्ट्राच्या अब्रूची लखतरे देशपातळीवर टांगल्या जातील तसेच या पुरोगामी महाराष्ट्राला अशोभनीय असे होईल, मागण्या लवकरात लवकर जर मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अतुल रांदड यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रा.बळवंत शिंदे यांनी निवेदनाद्वारे माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार व राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिला आहेे.
निवेदनात पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत- सध्या महाराष्ट्रात रिक्त असलेल्या दोन लाख पदांची भरती प्रक्रिया त्वरित चालू करावी, 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या भरून घेतलेल्या फॉर्मची भरतीप्रक्रिया त्वरित करण्यात यावी, ऑगस्ट 2023 पर्यंत 3 हजार पदांची तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे दिलेले आश्वासन शासनाने पाळावे, फेब्रुवारीमध्ये शिक्षक भरती करण्याचे आश्वासन पाळून शिक्षक भरती त्वरित करावी आणि टीईटी आणि शिक्षक भरतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी एस.आय.टी. मार्फत करण्यात यावी व संबंधितावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे, जिल्हा आणि प्रदेश पातळीवर जो परीक्षा घेण्याचा निर्णय 4 मे ला घेण्यात आला त्या भरती प्रक्रिया शासकीय यंत्रणेमार्फत राबविण्यात याव्यात त्यात कुठल्याही खाजगी कॉन्ट्रॅक्टचा सहभाग असता कामा नये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रत्येक परीक्षेचे प्रश्न रद्द करण्याचे प्रमाण चुकीचे उत्तर देण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे त्याची आयोग आणि आणि शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून भविष्यात येणार्या पीएसआय पदासाठी मैदानी चाचणीचे पूर्वीप्रमाणेच गुण ग्राह्य धरावे जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, जाहीर केलेली पोलीस भरती प्रक्रिया लवकर सुरू करावी आदी मागण्या लवकरात लवकर जर मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अतुल रांदड यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष प्रा.बळवंत शिंदे, उपाध्यक्ष रवीराज राठोड, सचिव अॅड.प्रा. शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष गोविंद कदम, डॉ.साईनाथ कवळे, डॉ. अर्जुन ढोणे, आनंदराव शिंदे, गणेश ढगे, अमोल देवसरकर, ओम सवंडकर, ज्ञानेश्वर जिगळे, हानमंत पवार, विलास भालेराव, वाजीद शेख, प्रियंशू वाघमारे, किरण गायकवाड, ज्ञानेश्वर टोटेवाड, कैलास उपासे, गोविंद तोटेवाड, ज्ञानेश्वर बोकारे, सोपान भोसले आदी उपस्थित होते.