राजेंद्र पाटील राऊत
गुत्तेदाराकडुन बिहारीपुर ते वळंकी रस्त्याचे काम निकृष्ठ,असेच काम सुरू राहिल्यास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने दिला उपोषणाचा इशारा…
मुखेड प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुक्यातील बिहारीपुर ते वळंकी या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे ता.उपाध्यक्ष पप्पु पाटील वळंकीकर यांनी तहसीलदार व जि.प.बांधकाम उपविभाग मुखेड यांना दि.१७/०३/२०२२ रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदरील रस्त्यावरील मुरुम, गिट्टी, अत्यंत निकृष्ठ दर्जाचे वापरत असुन डांबर सुध्दा कमी प्रमाणात टाकत आहेत. तसेच दबईकरण करण्यासाठी पाण्याचा कसल्याच प्रकारचा वापर होत नसल्याचा देखील आरोप केला आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे या रस्त्याचे कुठल्याच प्रकारे काम होत नाही. अशा निकृष्ठ कामामुळे हा रस्ता लवकरच उखडला जाण्याची शक्यता आहे. अगोदरच हा रस्ता होण्यासाठी अनेकांनी वेळोवेळी आंदोलने व निवेदने दिली आहेत. हा रस्ता येथील नागरीकांसाठी भविष्यात वरदान ठरणारा आहे पण रस्त्याचे निकृष्ठ काम होत असल्याने लवकरच रस्ता खराब होऊन गुत्तेदाराचे चांगभले होण्याची शक्यता नाकरता येत नाही असेही या निवेदनात म्हटले आहे. संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा ईशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे ता.उपाध्यक्ष पप्पु पाटील वळंकीकर यांनी दिला आहे.