Home विदर्भ क्रेडीट आऊटरिच अभियान कर्ज योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हाच अभियानाचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या...

क्रेडीट आऊटरिच अभियान कर्ज योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हाच अभियानाचा उद्देश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ; दि.१४ ला होणार तक्रार निवारण

84
0

राजेंद्र पाटील राऊत

क्रेडीट आऊटरिच अभियान

कर्ज योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे हाच अभियानाचा उद्देश

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ; दि.१४ ला होणार तक्रार निवारण

अकोला :(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- लहान व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी अर्थसहाय्याच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यात महत्त्वाची भूमिका ही बॅंका व वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या पतपुरवठ्याची असते. या योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे हा या क्रेडीट आऊटरिच अभियानाचा उद्देश आहे. कर्ज योजनांची माहिती देण्यासोबतच येत्या १४ तारखेला सामान्य नागरिकांच्या कर्ज मिळण्यासंदर्भातील अडीअडचणीही ऐकून घेतल्या जातील,असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सांगितले.

क्रेडीट आऊटरिच अभियानास जिल्ह्यात आज सुरुवात करण्यात आली. जिल्हास्तरावरील कार्यक्रम आज पार पडला. आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येईल. आज झालेल्या मुख्य सोहळ्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा, सेंट्रल बॅंक ऑफ इंडीयाचे क्षेत्रीय प्रबंधक चंद्रभानू गुप्ता, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय प्रबंधक अभिजित चंदा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, नाबार्डचे शरद वाळके, दीनदयाळ अंत्योदय अभियान शहर व्यवस्थापक गणेश विलेवार, जिल्हा अग्रणी बॅंकेचे आलोक तारेनिया आदी उपस्थित होते.आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात जमलेल्या महिला आर्थिक बचत गट, तसेच लहान उद्योजक, व्यावसायिक यांना शासनाच्या विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. जिल्हा साधन व्यक्ती पवन काबरा यांनी बॅंकांमार्फत वितरीत होणाऱ्या विविध कर्ज योजनांची माहिती दिली. शहरी भागातील लोकांना समुह गट उद्योगांबाबत माहिती देण्यात आली. खादी ग्रामोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

आपल्या संबोधनात जिल्हाधिकारी अरोरा म्हणाल्या की, कोणते विभाग कोणत्या योजना राबवितात. त्या योजनांना कसे अर्थसहाय्य मिळते. त्याचे निकष काय, प्रकल्प अहवाल कसे तयार करतात, बॅंक प्रकरण तयार करतांना ते कसे करतात याबाबत लोकांना माहिती करुन देणे हा या अभियानाचा उद्देश आहे. याच प्रमाणे लोकांना बॅंकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींबाबत याच अभियानाचा भाग म्हणून दि.१४ तारखेला जिल्हा नियोजन भवनात तक्रार निवारणासाठी कार्यक्रम घेण्यात येईल,असेही श्रीमती अरोरा यांनी यावेळी सांगितले.

याच कार्यक्रमात बॅंकाकडून कर्ज घेऊन यशस्वी व्यवसाय करणारे स्वयंसहाय्यता बचत गट, खाजगी व्यावसायिक, उद्योजक यांचा सत्कार करुन त्यांचे यशकथा कथनही करण्यात आले. तसेच ज्या बचत गटांना व व्यावसायिकांना कर्ज मंजूर झाले त्यांना कर्ज मंजूरी पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या कार्यक्रमाचे जिल्हा माहिती कार्यालयाने फेसबुकवरुन लाईव्ह प्रसारण केले होते. तसेच जिल्हा सुचना विज्ञान केंद्राने यु ट्युबवरुन लाईव्ह प्रसारण केले.
्यासाठी जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, निखिल वानखडे, प्रशांत गावंडे, शुभम थोरात यांनी तर जिल्हा माहिती कार्यालयाचे सतिश बगमारे, हबीब शेख, सुनिल टोमे यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत पदवाड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here