राजेंद्र पाटील राऊत
“नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न”
कौळाणेच्या रेशन दुकानात घुसले पाणी
पुरवठा विभागाची भोंगळपणाची कहाणी
(राजेंद्र पाटील राऊत यांजकडून)
मालेगांव- शासनाचे स्वस्त धान्य दुकान अर्थातच रेशन दुकान हे गोरगरीबांच्या हक्काचे ठिकाण.येथे मिळणाऱ्या रेशनवर गोरगरीब कुटूंबाची चुल पेटत असते.मात्र असे असले तरी पुरवठा विभागाच्या निष्काळजीपणामुळे रेशन दुकानातच पाणी घुसल्याने गोरगरीब नागरिकांना आपल्या हक्काच्या मोफत रेशनला मुकावे लागण्याची भयानक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यात असलेल्या कौळाणे (नि.) या गावी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोयायटीच्या वतीने चालविले जाणारे रेशन दुकान यापुर्वी गावातील सेल्समन दादासाहेब गायकवाड हे इमाने इतबारे चालवित असताना गावकीच्या राजकारणात सदरचे रेशन दुकान निलंबित करुन,दुसऱ्याच्या गळ्यात रेशन दुकानाची माळ टाकण्यासाठी पुरवठा विभागाने ज्या पध्दतीने तत्परता दाखविली.त्याच पध्दतीने रेशनचा माल ज्या ठिकाणावरुन वाटप होणार आहे,ती जागा तरी सुस्थितीत व चांगली आहे का? याची कुठलीही पडताळणी न करता फक्त दबावापोटी सदरचे रेशन दुकान घाई गडबडीतच व-हाणे येथील एका बचत गटाच्या गळ्यात टाकले खरे..मात्र गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे सदर रेशन दुकानात पाणी घुसून गोरगरीबांचा मोफतचा रेशनचा माल अक्षरशः भिजल्याने सुमारे बावीस ते पंचवीस गोण्याचा धान्यसाठा निरुपयोगी झाला आहे,तर रेशन दुकानात पाणी साचलेले असल्याचे दृश्यही ग्रामस्थांनी आँखो देखी बघितले.असे असतानाही सदर रेशन दुकानाला फलक नाही,किंवा अन्नधान्याचे नमूने ठेवण्यात आलेले नाहीत.अशा एक अनेक गंभीर बाबी असल्याच्या तक्रारी नागरिकांनी युवा मराठा न्युजशी बोलताना केल्यात.मग पुरवठा विभाग आता या अशा भयानक प्रकाराकडे डोळेझाक करणार आहे की काही कठोर कारवाईचा बडगा उचलणार आहे असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे.त्याशिवाय सदर रेशन दुकानात प्रत्यक्ष सचिव असलेल्या तलाठी पुरवठा निरीक्षक व तहसिलदारांनी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करुन कठोर कारवाई करण्याची मागणी यानिमिताने पुढे येत आहे.तर पावसाच्या पाण्यामुळे भिजलेले सुमारे साडेदहा क्विंटल धान्य पुन्हा पुरवठा विभाग सदर रेशन दुकानदाराला देणार की गोरगरीबांना मोफतच्या रेशनपासून वंचीत रहावे लागणार असाही प्रश्न आता नागरिक विचारीत आहेत.