विमाकंपनीला पावसाअभावी झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्या – शिवशंकर पा.कलंबरकर.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
गेल्या अनेक दिवसांपासून पावसात खंड पडल्यामुळे पिकं वाळत आहेत.आज रोजी मूग,उडीद ही पिके गेली,सोयाबीन उत्पन्नात 60% घट झाली.पिकविम्याच्या करारानुसार पावसात खंड पडून नुकसान झालेल्या पिकाला विमा मंजूर होतो.पण,पिकविम्याच्या बाबतीत शेतकरी हिताच्या नियमांची अंमलबजावणी करायची नाही.आणि विमा कंपनीच्या हिताचे नियमांची अंमलबजावणी करायची हा प्रकार गेल्या दोन वर्षांपासून मुखेड-देगलूर तालुक्यात चालू आहे.यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.विमा कंपनीला आदेशीत करून,पावसाअभावी वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करून,शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के साहेब यांना करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या नशिबी आस्मानी व सुलतानी संकटाचा सामना कायम आहे,हे सत्य आहे.यावर्षी खरिपाची पेरणी चांगली झाली होती.पिके चांगली आली होती.पण,येणं पिकं फुलांमध्ये आल्यावर पावसाने मोठी तड दिली त्यामुळे मूग,उडीद ही पिके गेली.सोयाबीनचे 60% टक्के नुकसान झाले आहे.सोयाबीनला चांगला भाव होता.सोयाबीन पिकलं असते तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटले असते.जेव्हा शेतकऱ्यांकडे माल असत नाही,तेव्हा मालाला भाव असतो, ही कृषिप्रधान देशाची शोकांतिका आहे.
वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी विमा कंपनीला आदेश द्या.तालुका कृषी कार्यालयात ऑफिस नसलेल्या विमा प्रतिनिधीवर कार्यवाही करा.विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पंचनामे करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत,त्याच्यावर कार्यवाही करा.
अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देगलूर तालुकाध्यक्ष विष्णू पाटील मलकापूरकर,राजेश्वर पाटील,उत्तम देशमुख,राहुल नागदरवाड उपस्थित होते.