निलंबित 12 आमदारांची राजभवनाकडे धाव; राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची घेतली भेट?
पालघर वैभव पाटिल विभागीय संपादक ठाणे पालघर
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू असून, ओबीसी आरक्षणावरून पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर प्रस्ताव मोजणीस असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. आमदारांना निलंबित केल्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे निलंबनावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. त्या निलंबित 12 आमदारांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांना झालेल्या प्रकाराची माहिती देऊन तालिका अध्यक्षांच्या निर्णयावर त्यांनी राज्यापालांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी राज्यपालांना एक लेखी पत्र देखील दिलं आहे.
OBC आरक्षणावर आक्रमक झालेल्या भाजपच्या आमदारांचा आवाज दाबण्यासाठी ठाकरे सरकारने 12 आमदारांना निलंबित केलं. ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतल्याचं निलंबित आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या आमदारांमध्ये भाजपचे आशिष शेलार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, जयकुमार रावत, राम सातपुते, नारायण कुचे, हरीश पिंपळे, पराग आळवणी, संजय कुटे, किर्तिकुमार, योगेश सागर यांचा समावेश आहे. या सर्वांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.