Home पश्चिम महाराष्ट्र साताऱ्यात विश्वविक्रम! एका दिवसात पुसेगाव ते म्हासुर्णे 30 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

साताऱ्यात विश्वविक्रम! एका दिवसात पुसेगाव ते म्हासुर्णे 30 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

210
0

राजेंद्र पाटील राऊत

साताऱ्यात विश्वविक्रम! एका दिवसात पुसेगाव ते म्हासुर्णे 30 किलोमीटरचा तयार झाला रस्ता

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने सातारा जिल्ह्यातील पुसेगाव ते म्हासुर्णे हा ३० किलोमीटरचा रस्ता एका दिवसात तयार करत विश्वविक्रम स्थापित केला आहे.
या विश्वविक्रमातून महाराष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त राजपथ इन्फ्राकॉन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याला अनोख्या स्वरूपात अभिवादन केले आहे.
या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही झाली आहे.
३० किलोमीटरचा हा रस्ता रविवार, दि. ३० मे २०२१ रोजी सकाळी सात वाजल्यापासून रात्री २ वाजेपर्यंत तयार करण्यात आला.
साडेतीन मीटर रुंद आणि ३० किलोमीटर लांबीचा हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, म्हासूर्णे असा होता.
जवळपास ४७४ कामगार आणि २५० वाहने व मशिनरीच्या साहाय्याने हे काम पूर्ण झाले.
कोविडसंदर्भात केंद्र व राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, सदा साळुंके, माजी अभियंता एस. पी. दराडे आदींनी रस्त्याच्या कामाची पाहणी करत राजपथ इन्फ्राकॉनचे कौतुक केले.
यावेळी राजपथ इन्फ्राकॉनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जगदीश कदम, संचालिका मोहना कदम, अर्थ संचालक डॉ. राजेंद्र हिरेमठ,  प्रकल्प संचालक शिवनाथ ढाकणे, सरव्यवस्थापक रोहिदास पिसाळ, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.
जगदीश कदम म्हणाले, “पुण्यातील राजपथ इन्फ्राकॉन कंपनीला पुसेगाव ते म्हासुर्णे या ४७ किलोमीटर रस्त्याचे काम हॅमअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाले होते.
यंदा महाराष्ट्र राज्य एकसष्टी साजरी करत असल्याने राज्याला मानवंदना देण्यासाठी,
या कोविडच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक पेरण्यासाठी हा विश्वविक्रम करण्याची संकल्पना पुढे आली.
राजपथ इन्फ्राकॉनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने एका दिवसात ३० किलोमीटर डांबरीकरणाचा रस्ता तयार करून विश्वविक्रम करण्याचा संकल्प पूर्ण केला.”
सर्वांच्या सहकार्यामुळेच राजपथ कंपनी हा विश्वविक्रम पुर्णत्वास नेऊ शकली,” असे जगदीश कदम यांनी नमूद केले.
उल्हास देबडवार म्हणाले, “करोनामुळे कामाला अडथळा येत होता.
पण या कठीण काळात अशी अनोखी कल्पना जगदीश कदम व राजपथने मांडली.
अशा नकारात्मक वातावरणात हा संकल्प पूर्ण करून प्रेरणा देण्याचे काम राजपथने केले आहे.
राज्यात पक्क्या रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध असून, अशा कार्यक्षम कंत्राटदारांनी दर्जेदार कामे कमी वेळेत केली तर राज्यातील जनतेला चांगले रस्ते मिळतील.
या रस्त्यांची गुणवत्ता, दर्जा नियमित स्वरूपात तपासला जात आहे.”
या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राजपथ टीमने सूक्ष्म नियोजन केले.
३० किलोमीटरच्या या रस्त्याला सहा तुकड्यांमध्ये विभागण्यात आले.
प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक होते.
या कामासाठी एकूण ११,००० मेट्रीक टन बिटुमन काँक्रीट, त्यासाठी आठ हॉट मिक्स प्लांट होते.
काँक्रीटचे हे मटेरीअल पसरविण्यासाठी सहा पेव्हर, १२ टँडम रोलर व सहा पी.टी.आर. वापरण्यात आले.
या मटेरीअलची ने-आण करण्यासाठी एकूण १८० हायवा टिप्पर वापरण्यात आले.
प्रकल्प व्यवस्थापक, तीन हायवे इंजिनिअर, दोन क्लालिटी इंजिनिअर, दोन सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी एका टीममध्ये होते.
एकूण सहा भागांचे मिळून ४७४ कर्मचारी पुर्ण कामासाठी तैनात होते.
यासाठी व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here