राजेंद्र पाटील राऊत
शेतकर्यांच्या नशिबी, आता अवकाळी..!
•••वादळी वार्यासह पावसामुळे पिकाचे प्रचंड नुकसान•••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर तालुक्यातील काही भागात सतत दोन दिवस प्रचंड वादळी वारा व विजेच्या गडगडाटासह पावसाचे सरी कोसळले त्यामुळे उभ्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी वर्ग हतबल झाला तरीही कालपर्यत महसुल आणि कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची पंचनामे व साधी पाहणी सुध्दा करण्यात आले नाही हे विशेष.
सध्या शेतात उन्हाळी भुईमुग, तीळ, सोयाबीन यासह भाजीपाला मध्ये काकडी, दोडका, टमाटे, वांगे, यासह फळबागेचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकरी वर्गात खुपच हतबलता असून संबंधित प्रशासनाने निदान शेताच्या बांधापर्यत येवून साधी पाहणी तरी करावी अशी मागणी करत आहेत.
तालुक्यातील सांगवी (क) बोरगाव, करडखेड, चाकुर, बळेगाव, कावळगाव, केदारकुंठा, दरेगाव, ढोसणी, भोकसखेडा, करडखेडवाडी, बल्लूर, कारेगाव, मरखेल, आमदापूर वळग, यासह आदी गावातील उभ्या पिकाचे व भाजीपाला आणि फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनातून सावरत शेतकर्यांनी अविरत परिश्रम करत मोठ्या कष्टाने उभारलेले पिके जमिनदोस्त झाली यामुळे बळीराजा पुरता हताश झाला असून याकडे लोकप्रतिनिधी महसुल प्रशासन कृषी विभाग तात्काळ पंचनामे करुन तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे..