राजेंद्र पाटील राऊत
महिनाभरापासून मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग पूर्णपणे बंदच.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील एकमेव शस्त्रक्रिया विभागाला महिनाभरापूर्वी आग लागली होती. यात ते पूर्णपणे जळून खाक झाले होते. यानंतर एक महिना उलटला तरीही हे शस्त्रक्रिया विभाग अद्यापही बंद असून मागील महिनाभरापासून मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद आहेत. यामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे.
मुखेड उपजिल्हा रुग्णालय हे सदैव चर्चेत राहणारी बाब आहे . शंभर खाटाच्या या रुग्णालयात हजारो समस्या आहेत. यात वैद्यकीय अधीक्षक यांचा कर्मचाऱ्यांवरील नसलेले नियंत्रण व त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अनुपस्थित राहून वेतन उचलणे यांच्या या वागण्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुखेड उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे रुग्णालय असून यासाठी केवळ एकच शस्त्रक्रिया विभाग कार्यरत आहे. या उपजिल्हा रुग्णालयाला विजेची कमतरता पडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर खर्च करून एक्सप्रेस फिडर बसविण्यात आला आहे. हे एक्सप्रेस फिडर सुद्धा कर्मचाऱ्यां सारखे कामचुकार असून अनेक वेळा उपजिल्हा रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित होतो. तर कधी कमी किंवा जास्त दाबाने वीज पुरवठा केला जातो. याचा परिणाम येथील वायरिंग वर होत असून अनेक वेळा या उपजिल्हा रुग्णालयातील वायरिंग जळालेली आहे. अशीच घटना दि.२२ फेब्रुवारी रोजी घडली शस्त्रक्रिया विभागातील वातानुकुलित यंत्राला याच कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा झाल्याने आग लागली व सबंध शस्त्रक्रिया विभाग जळून खाक झाले. सुदैवाने या वेळी शस्त्रक्रिया विभागात रुग्ण अथवा कर्मचारी उपस्थित नव्हते. यात विशेष बाब म्हणजे दोन महिन्यापूर्वीच संबंध उपजिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिट झालेले होते. मुखेड उपजिल्हा रुग्णालयात आठवड्यातून काही दिवसात रुग्णावर नेत्र,कुटुंब नियोजन , हायड्रोसिल असे लहान-सहान शस्त्रक्रिया केले जात होते. मात्र शस्त्रक्रिया विभागालाच आग लागल्यामुळे या शस्त्रक्रिया मागील महिनाभरापासून पूर्णपणे बंद आहेत. जिल्हा रुग्णालयातील या बाबीची पाहणी करणे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून त्यांच्याकडून केवळ शस्त्रक्रिया विभागाची पाहणी करण्यात आलेली आहे. अद्यापही इलेक्ट्रिकल अभियंता या शस्त्रक्रिया विभागाला भेट देऊन नवीन वायरिंग अजून सुरू न केल्यामुळे सदर शस्त्रक्रिया विभाग बंदच आहे. यामुळे गोरगरीब नागरिकांना लहानसहान शस्त्रक्रिया करण्यासाठी नांदेडला जावे लागत आहे. सदर शस्त्रक्रिया विभाग लवकरात लवकर सुरू करून रुग्णांना आधार द्यावा अशी मागणी सर्वसामान्यातुन होत आहे.