राजेंद्र पाटील राऊत
शेतकऱ्यांना मिळणार एक ते तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज ; राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
विशेष प्रतनिधि – राजेश एन भांगे
मुंबई, दि.९ – कर्जमाफीपासून वंचित असलेल्यांना लवकरच लाभ कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या प्रवेशद्वारांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने अंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
तसेच कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बैठक झाली.
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा या वेळी घेतला.
सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील पवार, संचालक सतीश सोनी आदी बैठकीला उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तर शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होते.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेऊन वेळेवर कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे.
त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना भुसे आणि बाळासाहेब पाटील यांनी या वेळी केल्या.
शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते.
मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे.
त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जाईल.