राजेंद्र पाटील राऊत
मोदी सरकार कामाचे तास ९ वरून १२ तास करण्याच्या तयारीत !
दिल्ली : मोदी सरकार लवकरच कामाचे १२ तास करण्याच्या तयारीत आहे. १ एप्रिल २०२१ पासून कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटी, भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ आणि कामांच्या तासांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटी आणि पीएफमध्ये वाढ होणार आहे. तर हातात येणाऱ्या पगारामध्ये मात्र कपात होणार आहे. इतकच नाही तर कंपन्यांच्या बॅलन्स शीटवरही प्रभाव पडण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे मोदी सरकार कामाचे तास आता ९ वरुन १२ करण्याची शक्यता आहे. त्यात दर ५ तासांनंतर अर्धा तासाचा ब्रेक दिला जाणार आहे.
रोजगाराच्या नव्या परिभाषेनुसार मिळणारा भत्ता मूळ पगाराच्या अधिकाधिक ५० टक्के असणार आहे. याचा अर्थ मूळ वेतन एप्रिलपासून एकूण वेतनाच्या ५० टक्के किंवा अधिक असायला हवं. देशाच्या ७३ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे कामगार कायद्यात बदल करण्यात येणार आहेत. सरकारच्या मते हे नवीन कामगार कायदे कंपनी आणि कर्मचारी अशा दोघांच्या हिताचे आहेत.
केंद्र सरकारच्या नव्या बदलांनुसार मूळ वेतन हे एकूण वेतनाच्या ५० टक्के अधिक असणं गरजेचं आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होणार आहे. कारण, कारण वेतनाचा भत्त्यांव्यतिरिक्त असलेल्या भाग हा एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असणार आहे. तर एकूण वेतनात भत्त्यांचा हिस्सा हा अधिक होणार आहे. त्यामुळे मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं तुमच्या पीएफमध्ये वाढ होणार आहे. कारण, पीएफ हा मूळ वेतनावर आधारित असतो. मूळ वेतनात वाढ होणार असल्यानं आता तुमच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होणार आहे.
युवा मराठा न्युज नेटवर्क .