राजेंद्र पाटील राऊत
कोल्हापूर जिल्ह्यातील ६ गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला स्थगिती
कोल्हापूर जिल्ह्यातील सहा गावांच्या सरपंच पदाच्या निवडीला न्यायालयाने स्थगिती देण्यात आली आहे. कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील ३१ गावांच्या सरपंच आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. या प्रकरणी मंगळवारी (दि. ९) याचिकाकर्त्यांची सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्यांना दिले. याबाबतचा निर्णय १६ फेब्रुवारीपूर्वी घ्यावा, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे.
कोगे (ता. करवीर) येथील विश्वास पाटील, शिरटी व मजरेवाडी (ता. शिरोळ) येथील अनुक्रमे रामदास भंडारे व किशोर जुगळे आणि उंड्री (ता. पन्हाळा) येथील अजित खोत यांनी सरपंच आरक्षणविरोधात उच्च न्यायालायत धाव घेतली.
त्यांच्यासह फणसवाडी (ता. भुदरगड) आणि खुपीरे (ता. करवीर) सरपंचपदाच्या आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील एकूण ३१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेण्यात आला होता.
या सर्व प्रकरणांची आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती विनय जोशी व एस. जे. खट्टवाला यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी झाली. या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुनावणी घ्या. त्यासाठी संबंधितांना स्वतंत्र नोटीस पाठविण्याची आवश्यकता नाही. संबंधित याचिकाकर्ते सकाळी ११वाजता उपस्थित राहतील, त्यांची सुनावणी घ्या, असे न्यायालयाने सांगितले.
याचिकाकर्त्यांना लेखी म्हणणेही मांडता येईल. ८ते ११फेब्रुवारी या कालावधीत निवडणूक कार्यक्रम घ्या, ही सर्व प्रक्रिया १६ फेब्रुवारीच्या पुढे जाणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका रद्द केली.
युवा मराठा न्युज नेटवर्क .