Home Breaking News विष्णू जलाशयावर आढळला “अमूर फाल्कन ” पक्षी

विष्णू जलाशयावर आढळला “अमूर फाल्कन ” पक्षी

226
0

 

 

पेठ वडगांव प्रतिनिधी :- दरवर्षी तब्बल २२००० किलोमीटर इतका प्रवास करणाऱ्या शिकारी वर्गातील “अमूर फाल्कन “या पक्ष्याने तळसंदे येथील ऐतिहासिक विष्णु जलाशयावर  वास्तव्य करून पक्षीमित्रांसाठी सुखद धक्का दिला.चावरे (ता. हातकनंगले)येथील वाईल्ड लाईफ कॉन्सर्व्हेशन अँण्ड रिसर्च फौंडेशन चे अद्यक्ष व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे युवराज पाटील यांनी या पक्षाची नोंद केली.रविवार (दि.22) रोजी सकाळी सव्वा आठ सुमारास पक्षीनिरीक्षण नोंदी व छायाचित्रणासाठी गेले असता दक्षिणेकडील बाजुस असणाऱ्या निलगिरी च्या राईत विजेच्या तारेवर कटाक्ष नजरेने भक्ष्याच्या शोधात बसलेला दिसला.थोड्यावेळाने पाण्याच्या काठावरून फेरफटका मारत निलगिरी च्या झाडावर बसला.प्रथम हा पक्षी कॉमन केस्ट्रेल (सामान्य खरुची)असलेचे वाटले परंतु पंख व पोठाखालील रंग तसेच चोचीच्या मागील मांसल आवरणाचा रंग यावरून हा नक्कीच वेगळा शिकारी पक्षी असलेचे जाणवले.या नवख्या पक्ष्याचे फोटो कॅमेरा मध्ये टिपले. सदर फोटो मुंबई येथील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बी.एन.एच.एस.)चे  कार्यक्रम अधिकारी नंदकिशोर दुधे व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अद्यक्ष डॉ.जयंत वडतकर यांना पाठवण्यात आले असता त्यांनी “अमूर फाल्कन “पक्ष्याची मादी असलेचे सांगितले.उपलब्ध माहितीनुसार  मिळालेली माहिती अशी —-
मराठी मध्ये याला “अमूर ससाणा” असे नाव आहे.शास्त्रीय भाषेत  “फाल्को अमुरेनसिस” असे नाव आहे.अमूर फाल्कनचा मुळ निवास चायना च्या पूर्व भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या दहा नदयापैकी एक असणारी अमूर नदीच्या खोऱ्यात असून हिंवाळ्यात ते दक्षिण अफ्रिकेत जातात.  शिकारी पक्षांमध्ये सर्वात लांब स्थलातर करणारा हा पक्षी आहे.  त्याच्या मूळ ठिकाणी  अतिथंडी सुरू झाली की अन्य पक्षांप्रमाणे अमूरची स्थलांतर साठी लगबग सुरू होते. चायना मार्गे  ते भारताच्या उत्तर-पूर्व राज्यामध्ये, विशेषत नागालँड  येथे येतात.तेथुन ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये बंगालचा उपसागर, मध्य भारत, अरबी समुद्र मार्गे करून थेट दक्षिण आफ्रिकेत पोहोचतात. तिथे ते संपूर्ण उन्हाळा म्हणजे उत्तर गोलार्धातील हिवाळा संपेपर्यंत मार्चपर्यंत विसावतात. एप्रिलमध्ये पुन्हा एकदा ते त्यांच्या  मूळ जागी परतण्यासाठी निघतातात.
दक्षिण अफ्रिकेच्या प्रवासावर निघण्यापूर्वी हे पक्षी मोठ्या संख्येने नागालँड मधील काही भागात येतात.तिथे विश्रांती घेऊन थेट आफ्रिकेकडे  जातात.2012 च्या दरम्यान नागालँड मध्ये  या पक्ष्यांची बेसुमार कत्तल झाली होती.येथे आदिवासी जमात जास्त असलेने,येथील आदिवासींचा ‘शिकार व शेती ‘हा मुख्य व्यवसाय आहे.लोक जाळीच्या सहाय्याने अमूर पक्षाला पकडून त्याची शेकडोंच्या संख्येने शिकार करत असे त्यामुळे ह्या पक्ष्याच्या स्थलांतरित प्रवास क्षेत्रात धोके वाढले होते.नागालँड वनखाते आणि विविध राष्ट्रीय स्तरावरील एनजीओंच्या माध्यामातून जनजागृती माध्यमातुन या पक्ष्यांचे संवंर्धनाचे काम हाती घेण्यात आले.2013 ला  या पक्ष्यांची होत असलेली कत्तल पूर्णपणे थांबली. अमूर पक्षी हे दक्षिण पूर्व रशिया व  उत्तर चायना मध्ये  घरटी बांधतात.हा पक्षी आकाराने कबुतरापेक्षा एवढा असतो. नराची वरील बाजु काळसर करड्या रंगाची,तर खालील अंग करडे,मात्र त्याच्या मांड्या आणि शेपटी खालील पिसे तांबारल्यागत लालरंगाची,उठावदार नारिंगी लालसर रंगाचा डोळ्याभोवतालचा भाग,चोचीच्या मागील भाग व पाय असतो.मादी काळसर करड्या रंगाची असून अंगावर काळ्या रेषा असतात .मानेच्या मागील बाजुवर सफेदसर  केशपुच्छ असते.खालील अंग फिकट लालसर सफेद रंगाचे ,छातीच्या वरील भागावर काळे ठिपके असतात. छातीची खलील बाजू व दोन्ही बाजुवर रेषा असतात.पंखाच्या आतील बाजुवर सफेदरंगी रेषा असतात.पोटा खालची जागा चिन्ह रहीत  असते.चोच आखुड व पुढे वाकलेली व टोकदार असते.सहसा गवताळ कुरणे व माळरान,पठारी प्रदेश अशा ठिकाणी निवास असतो.हवेत  उडणारे चतुर कीटक (ड्रॅगनफ्लाय)जास्त आवडीने खातो.एप्रिल ते मे हा विणीचा हंगाम असतो.चार ते सहा अंडी घालतो. नर व मादी दोघेही अंडी उबविण्याचे काम करतात.शिकारी पक्ष्यांच्या मध्ये सर्वात जास्त अंतर स्थलांतर करणारा हा पक्षी तळसंदे सारख्या गावातील विष्णू जलाशयावर वास्तव्य करून पुन्हा आफ्रिकेकडे रवाना होईल ही येथील पक्षीमित्रांना व पक्षी अभ्यासकाना आनंदाची बाब आहे. पुढील दि.23 व दि.24 रोजी पुन्हा या पक्षाचा शोध घेतला परंतु दिसला नाही.अमूर पक्ष्याच्या स्थलांतराच्या मार्गाच्या दृष्टीने संशोधनास विष्णु
जलाशयावरील ही ऐतिहासिक नोंद महत्वपूर्ण ठरेल.दिवसेंदिवस नवनवीन स्थलांतरित पक्षाच्या नोंदी होत असलेने विष्णू जलाशयाच्या पक्षीवैभवात भरच पडत आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleआघाडी शासनाचा व विजवितरण कंपनीचा निषेध करत देवळयात भाजपाचे रास्तारोको आंदोलन
Next articleशेतकऱ्यांचे स्वप्न भंगले, विदारक अनुभव! मेथीला भाव म्हणून पेरली मेथी ;मात्र पदरी फक्त तोटाच
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here