पाच वर्षे सत्तेत असताना चंद्रकात पाटलांनी पदवीधरांचे प्रश्न का सोडविले नाहीत?
कोल्हापूर: पुणे पदवीधर , शिक्षक मतदारसंघाची निवडणुक रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. काल इचलकरंजीत प्रचाराचा शेवटच्या प्रचारात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदरासंघातील महाविकास आघाडी उमेदवारांचा प्रचारासाठी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.मंत्री सतेज पाटील पुढे म्हणाले चंद्रकांत पाटील हे गेली 12 वर्षे पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. गेली पाच वर्षे सत्तेत होते. त्यांनी पदवीधरांचे प्रश्न का सोडविले नाहीत, असा सवाल विचारला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कालावधीत बेरोजगारीमध्ये वाढ झाली, त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकारच नाही, असा आरोप मंत्री सतेज पाटील यांनी केला.
इचलकरंजी शहरातील तोष्णीवाल गार्डनमध्ये पुणे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रा.जयंत आसनगावकर यांच्या प्रचारार्थ संस्थाचालक व शिक्षकांचा मेळावा पार पडला. यावेळी मंत्री पाटील बोलत होते.
सतेज पाटील यांनी पदवीधरांचे व शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, हे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार असण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केले. शिक्षक मतदार संघातून कोल्हापूर जिल्ह्याला आमदार होण्याचा पहिल्यांचा मान मिळणार असल्यांने प्रा. जयंत आसगावकर यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात शिक्षकांनी रस्त्यावर उतरुन चांगले काम केले आहे. पण त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी शिक्षण अधिकार्यांचे अधिकार कमी करण्याची गरज आहे. शिवसेनेचा भक्कम पाठिंबा असल्यांने महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा शिल्पकार हा कोल्हापूर जिल्हा असणार आहे.
पुणे शिक्षकचे उमेदवार प्रा.आसगांवकर यांचेही भाषण झाले. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असून विरोधकांच्या बुध्दीभेद आणि भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आमदार राजू आवळे, मदन कारंडे, महादेव गौड, बाबा पाटील, दादासाहेब लाड, शशांक बावचकर यांची भाषणे झाली. स्वागत पी.डी. शिंदे यांनी तर प्रास्ताविक अशोक हुबळे यांनी केले.
कोल्हापूर (युवा मराठा न्यूज नेटवर्क )