एसटी महामंडळाच्या स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव, 28 हजार कर्मचारी होणार कमी?
प्रतिनिधी= किरण अहिरराव
मुंबई, 20 जुलै : एसटी महामंडळात स्वेच्छा निवृत्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच राज्य सरकारकडे देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या निर्णयामुळे तब्बल 28 हजार कर्मचाऱ्याची नोकरी जाण्याची शक्यता आहे. बीएसएनएल नंतरची ही सर्वात मोठी स्वेच्छा निवृती असणार आहे.
एसटी महामंडळाकडून 50 वर्ष वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती दिली जाईल. महामंडळात काम करणाऱ्या 28 हजार कर्मचाऱ्यांचं वय 50 वर्षापेक्षा अधिक आहे. या निर्णयमुळे महामंडळाची दरमहा 100 कोटी रुपयांच्या पगाराची बचत होणार आहे. स्वेच्छा निवृत्तीसाठी चौदाशे कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
याबाबत महामंडळ राज्य सरकारकडे मागणी करणार आहे. राज्य सरकारने निधी दिला तरंच हा निर्णय होऊ शकणार आहे.
क्षमतेपेक्षा अधिक कर्मचारी झाल्यानं योजना आणण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे. राज्यात एक बस मागे 6:15 कर्मचारी आहेत. देशाच्या 14 राज्याच्या परिवहन मंडळात हे प्रमाण एक बस मागे पाच कर्मचारी आहे.
कोरोनाच्या संकटात कोलमडला एसटीचा डोलारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एसटीचा पूर्वीचा तोटा पाच हजार कोटी रुपये आहे. त्यात लॉकडाऊनमुळे दोन हजार दोनशे कोटींची भर पडली आहे. महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडे 480 कोटी रुपये मागितले आहेत.
पगाराबाबत काय आहे स्थिती?
– गेल्या महिन्यात निम्मे पगार
– 100 दिवसांपासून एस टी सेवा ठप्प
– दिवसाला 22 कोटी उत्पन्नाच्या ठिकाणी 20 लाख रुपये होतंय उत्पन्न
– क्षमतेच्या 10 टक्के गाड्या सुरू
– एकूण क्षमता 18 हजार 500 बस
– सध्या सुरू आहे 1800 बस
– डिझेल, टायर , स्पेअर पार्टचे 800 कोटी थकले
– एस टी पुरवठादार हवालदिल