![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2024/04/IMG-20240428-WA0052.jpg)
![](https://yuvamarathanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20240114-WA0024.jpg)
*🛑पुणे : यंदा आषाढी निमित्त पायी दिंडी सोहळा रद्द! बैठकीत निर्णय.*🛑
पुणे ⭕( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच यावेळी आळंदी आणि देहूवरुन निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर, एसटी किंवा विमानाने पंढरपूरला नेण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना यंदाच्या आषाढी वारीचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक घेण्यात आली. यावेळी आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या हे नंतर ठरवलं जाईल. तसंच आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूहून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.
दरम्यान, मानाच्या सात पालख्या पालख्या आहेत, या पालख्यांमधील संतांच्या ज्या पादुका आहेत त्या देव भेटीसाठी पंढरपुरात निश्चित जाणार आहेत. दशमीला या पादुका पंढरपूरमध्ये जातील. मात्र त्या कशा जातील हे अदयाप निश्चित झालेलं नाही, असं आळंदी देवस्थानचे प्रमुख विकास ढगे यांनी सांगितलं आहे. तसंच पादुका नेत असताना संस्थान कमिटी परंपरा व अन्य बाबी यांची सांगड घालण्याचं काम करणार आहे. तर व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी सरकारची असणार आहे.