आशाताई बच्छाव
आता फक्त माणसं सुधारण्याची गरज: रावसाहेब दानवे
विल्हाडीच्या बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन
बदनापूर / जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतीवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असून तालुका , जिल्हा ,राज्य आणि देश सुधारले, आता फक्त माणसं सुधारण्याची गरज आहे,असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केले.
आशयघन प्रकाशनाचे शालेय विद्यार्थ्यांच्या रचित कवितांचे विनोदकुमार पांडे संपादित “विल्हाडीच्या बालकविता” संग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनी गुरुवारी ( ता. 01)
जिल्हा परिषद शाळेच्या सभागृहात रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भावकवयित्री डॉ.संजीवनी तडेगांवकर ,आशयघन प्रकाशनाचे पंडितराव तडेगांवकर,रोटरी क्लब ऑफ जालनाचे रो. दीपक बगडिया,सचिव रो. रवी भक्कड,सरपंच ममता इनामे, शालेय समिती अध्यक्ष भगवान कान्हेरे, संजय खरात, मुख्याध्यापक विष्णू सोनटक्के, ज्ञानेश्वर इनामे,विनोद कुमार पांडे ,ग्रा.पं.व शालेय समितीचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
रावसाहेब पाटील दानवे यावेळी म्हणाले, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे वाढलेले प्रमाण हे चिंताजनक असून बालवयातच शिक्षणाप्रती गोडी निर्माण करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य वळण देण्याचे काम गुरुजींनी करावे असे आवाहन त्यांनी केले. प्रकाशित पुस्तकाचे मुखपृष्ठ ,शीर्षक, सुलेखन, रेखाटने येथील विद्यार्थ्यांचे असल्याबद्दल दानवे यांनी समाधान व्यक्त केले.
डॉ. संजीवनी तडेगांवकर यांनी ग्रंथावर भाष्य करताना धडपडणारे, व्यासंग असणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची योग्य किंमत करतात, असे सांगून काव्यसंग्रहात विद्यार्थ्यांमधील प्रतिभा आणि शब्दांची ताकद उमटली आहे असे त्यांनी सांगितले.






