आशाताई बच्छाव
जालना – नांदेड समृद्धी : शेतकऱ्यांच्या फळबागांना वाढीव दर द्यावा – आ.कैलास गोरंटयाल
—————————————-
मुंबईत कृषिमंत्री धनंजय मुंढेंची भेट घेवून केली मागणी
—————————————-
जालना दि. ५ (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) जालना – नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादीत होणाऱ्या जमिनीतील फळबागांना योग्य दर निश्चित करून त्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात यावा अशी आग्रही मागणी जालन्याचे आ. कैलास गोरंटयाल यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे आज मंगळवारी लेखी पत्राद्वारे केली आहे.
जालना – नांदेड या समृध्दी महामार्गावरील शेतजमिनी संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आ. कैलास गोरंटयाल यांनी दि. २ ऑगस्ट शुक्रवार रोजी जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे मांडून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.त्यावेळी जिल्हाधिकारी पांचाळ यांनी सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठवणार असल्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, आ. कैलास गोरंटयाल यांनी आज मंगळवारी याच प्रश्नासाठी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंढे यांची मुंबई येथे मंत्रालयात भेट घेतली. जालना – नांदेड समृद्धी महामार्गाची अधिसुचना ही २०२१ साली कोविड महामारीचे निर्बंध असतांना काढण्यात आलेली आहे. कोरोना महामारीमुळे बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे जालना – नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या शेतजमिनीतील द्राक्ष, डाळींब, सिताफळ, जांब या फळझाडांचा दर कमी निघाला असून या तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांचे खुप मोठे नुकसान होत आहे. प्रशासन या अडचणींची दखल घेत नसल्याने जमीन संपादनासाठी शेतकरी संमती देखील देत नसल्याचे आ. गोरंटयाल यांनी कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.