आशाताई बच्छाव
देवळा तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार
सतीश सावंत-विभागीय प्रतिनिधी : क. स. मा. दे.
तालुक्यातील खर्डे येथे शुक्रवारी (दि. १९) रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठ शेळ्या ठार झाल्याच्या घटनेने परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शुक्रवारी (दि. १९) रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डे येथील शेतकरी वसंत कारभारी पवार यांच्या घरासमोरील हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतातील गोठ्यात बिबट्या शिरला आणि त्याने यातील आठ शेळ्या फस्त केल्या.
नेमकं काय घडलं..?
सकाळी उठल्यावर ही घटना पवार यांच्या लक्षात आली. या घटनेची माहिती पवार यांनी आपल्या जवळच्या लोकांना सांगितल्यावर सर्वांनीच घटनास्थळी धाव घेतली. शेतीपूरक व्यवसाय म्हणून त्यांनी आपल्या शेतात गोटफार्म तयार करून शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. या गोठ्यात बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढविला व यात त्याने आठ शेळ्या ठार झाल्याने पवार यांचे जवळपास ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या दहशतीने या परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी गवळी यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. याची नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी वसंत पवार, केदा पवार यांनी केली आहे.