आशाताई बच्छाव
अतिक्रमण हटाव पथकाच्या बेजबाबदारपणामुळे माहुरवेश येथील महिलेचे पक्के राहते घर उद्धवस्त
भरपाई देण्यास नकार; मुख्याधिकारी म्हणतात ‘केस करा’
महिलेचा कुटुंबासहीत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- स्थानिक माहुरवेश येथे नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत पथकातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बेजबाबदारपणामुळे तेथे राहत असलेल्या सौ. शारदा गोविंद कच्छवे या महिलेचे पक्के घर जेसीबीने उद्धवस्त करण्यात आले. या प्रकारामुळे महिलेच्या संसाराची राखरांगोळी झाली असून संसार उघड्यावर आला आहे. मात्र तुम्ही आमच्यावर केस करा असे सांगत मुख्याधिकार्यांनी नुकसान भरपाई देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शारदा कच्छवे यांनी न्यायासाठी जिल्हाधिकार्यांकडे धाव घेतली आहे. याबाबत १५ जुलै रोजी निवेदन देवून नुकसान भरपाई न मिळाल्यास कुटुंबासहीत बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा महिलेने दिला आहे.
निवेदनात नमूद आहे की, सौ. शारदा कच्छवे ह्या पती गोविंद कच्छवे व दोन मुलांसह शुक्रवारपेठ भागातील माहुरवेश येथे न.प. हद्दीतील त्यांच्या मालकीच्या घरात गेल्या २० वर्षापासून मोलमजुरी करुन राहत आहे. सदर घराची त्यांच्याकडे मालमत्ता क्रमांक ३२८ ची असेसमेंट नक्कल, पक्की खरेदी व नमुना ड आहे. तसेच त्यांच्या घरावर घरकूल सुध्दा मंजुर झालेले आहे. १२ जून २०२४ रोजी त्या कुटुंबासहीत दवाखान्याच्या कामाकरीता बाहेरगावी गेल्या असता नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या आदेशानुसार माहुरवेश येथे राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेत सहभागी अधिकारी व कर्मचार्यांनी बेजबाबदारपणे जेसीबी चालवून त्यांचे राहते घर उध्दवस्त केले. यामध्ये कच्छवे यांच्या घराच्या मागील दोन खोल्या व संडास बाथरुम पाडल्या गेल्या व घरातील भांडीकुंडी, फर्निचर, टीव्ही, कपाट, पंखे, विजेची वायरींग व इतर मौल्यवान वस्तु नष्ट झाल्या. ही बाब त्यांना दुसर्या दिवशी माहिती पडताच त्या पतीसह १३ जुन रोजी नगर परिषदेत गेल्या व मुख्याधिकार्यांना हा प्रकार सांगीतला. यावर मुख्याधिकार्यांनी चुक मान्य करुन तुम्हाला पुरग्रस्तांच्या निधीतून नुकसान भरपाई देतो असे सांगीतले. मात्र दुसर्या दिवशी मुख्याधिकारी गायकवाड यांनी नुकसान भरपाई देण्यास सपशेल नकार दिला व तुम्हाला केवळ घरकुलाचेच पैसे मिळतील. नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगुन त्यांची बोळवण केली. मुख्याधिकार्यांच्या अशा बोलण्यामुळे कच्छवे परिवार गर्भगळीत झाला. घर उध्दस्त केल्यानंतर नगर परिषदेने घराच्या नुकसानीचा साधा पंचनामा सुध्दा केला नाही. त्यामुळे न्याय मागण्यासाठी शारदा कच्छवे यांनी १४ जून रोजी घराची नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हाधिकारी, न.प. मुख्यधिकारी, शहर पोलीस स्टेशन यांना निवेदने दिली होती. मात्र आता एक महिना उलटून गेला तरीही त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही.
तरी माझे राहते घर उद्धवस्त करण्याच्या प्रकाराला न.प. मुख्याधिकारी व अतिक्रमण मोहीमेत सहभागी संबंधीत अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर त्वरीत पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व माझ्या घराचे व घरातील वस्तुुंचे नुकसान केल्याबद्दल घटनास्थळाचा त्वरीत पंचनामा करुन मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शारदा कच्छवे यांनी केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास मी माझे पती व लहान मुलाबाळांसह लोकशाही पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यत बेमुदत आमरण उपोषणास बसेल. व यादरम्यान माझ्या व माझ्या परिवाराच्या जिवित्वाची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे.