आशाताई बच्छाव
शहरातील १०४ कोटींच्या विकासकामात अधिकारी, लोकप्रतिनिधींचा भ्रष्टाचार !
कामे थातुरमातुर झाल्याचा आरोप : शिवसेना ठाकरे पक्षाचा बेमुदत उपोषणाचा इशारा
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- नगर परिषद अंतर्गत शहरात झालेल्या १०४ कोटी रुपयाची कामे ही केवळ थातुरमातुर पध्दतीने कागदोपत्रीच पुर्ण करण्यात आली असून या योजनेच्या कामामध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे या १०४ कोटी रुपयाच्या विकास कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करुन यात दोषी असणारे अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कठोरात कठोर कारवाई करा अन्यथा पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे. पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी व शहरप्रमुख गजानन भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनात तसेच शहर समन्वयक राजाभैय्या पवार, जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांच्या नेतृत्वात १० जुलै रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, वाशिम नगर परिषदअंतर्गत, न. प. क्षेत्रातील विविध योजनेअंतर्गत ७ ऑक्टोबर २०१६ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १०४ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पाटणी व्यापारी संकुलात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता. या विकास कामांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत वाशिम शहरातील विविध रस्त्यांची कामे किंमत ८१.५० कोटी, विशेष रस्ता अनुदानांतर्गत विविध रस्ते बांधकाम किंमत ८.५० कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत टेंम्पल गार्डन विकास किंमत ६ कोटी, जिल्हा वार्षिक नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत अॅडव्हेंचर पार्क प्लॅनेटोरीअम (तारांगण) बांधणे किंमत ३ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध रस्ते विकास कामे किंमत २ कोटी, अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास अंतर्गत विविध रस्ते बांधकाम किंमत १.२९ कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वाशिम शहरामध्ये हायमास्ट व एलईडी लाईट लावणे किंमत १ कोटी, मुख्याधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम किंमत १ कोटी अशा एकूण १०४.२९ कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे. यासोबतच २४ तास पाणी पुरवठा योजनेकरीता ५५ कोटी रुपये, भूमिगत गटार योजना ३३ कोटी रुपये, न. प. प्रशासकीय इमारत १० कोटी, अद्ययावत नाट्यगृह १० कोटी रुपये, व्यापार संकुल १८ कोटी रुपये, नागरी दलीतवस्ती विविध रस्ते १८ कोटी रुपये तसेच अॅडव्हेंचर पार्क, प्लॅनेटोरीअम (तारांगण), टेम्पल गार्डन, अॅम्फी थिएटर, अग्निशमन केंद्र आदी कामांचा समावेश होता. वास्तविक पाहता शहरात ही कामे केवळ थातूरमातूर पद्धतीने कागदोपत्रीच पूर्ण झाली असून या योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ही बाब शहरात फेरफटका मारल्यास निश्चितच लक्षात येते. टेम्पल गार्डनवर एवढे रुपये खर्च करून सध्याची स्थिती अशी आहे की, वाढलेल्या झाडांमुळे एकट्या व्यक्तीला फेरफटका मारण्यास भीती वाटते. यातील काही विकास कामे तर फक्त कागदोपत्रीच आहेत. तरी आपण या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष देवून उच्चस्तरीय समितीमार्फत तातडीने चौकशी करुन दोषींबर दंडात्मक कारवाई करावी. अन्यथा स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर १४ ऑगस्टपासून नगर परिषद कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतांना जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. सुधीर कव्हर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सौ. मंगलाताई सरनाईक, जिल्हा संघटक गजानन देशमुख निवासी उपजिल्हाप्रमुख माणिकराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख अनिल राऊत, नागोराव ठेंगडे, तालुकाप्रमुख रामदास मते, सहसंपर्कप्रमुख विवेेक नाकाडे, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन मडके, जुबेर मोहनावाले, विधानसभा समन्वयक बालाजी वानखेडे, रवि पाटील, शहर संघटक नामदेवराव हजारे, युवतीसेना जिल्हाप्रमुख प्रिया महाजन, ज्योतीताई खोडे, सुनिता गव्हाणकर, रंजना पारिसकर, शाम दळवी, रामकृष्ण वानखेडे, गणेश गाभणे, शशिकांत पेंढारकर, शहरप्रमुख आशिष इंगोले, चंद्रकांत खेलूरकर, केशव डुबे, नाना देशमुख, विभागप्रमुख अविनाश गव्हाणकर, किशोर थोरात, रविंद्र पाटील, मोहन देशमुख, सुशिल भिमजीयाणी, राजु धोंगडे, महादेव कांबळे, नुरभाई, भगवान वाकुडकर आदींची उपस्थिती होती.