आशाताई बच्छाव
विधानसभेला भाजप शिंदे-पवारांना मागणीपेक्षा अर्ध्याही जागा द्यायला तयार नाही..?
महायुतीत विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू..?
सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)
लोकसभा निवडणुकीचा धुरळा बसत नाही की तोच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जागा वाटपाचीही चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे. यातच आता महायुतीत जागा वाटपाची संभाव्य आकडेवारी समोर आली असून शिंदे गट 100, अजित पवार गट 90, जागांसाठी आग्रही असून अशातच रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले हे देखील 10 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे.
तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे आणि विधानसभेला 250 जागांसाठी तयारी करायला सांगणारे राज ठाकरे यांनीही 20 जागांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर भाजपही 155 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व पक्षांकडून आपली इच्छा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, आत्तापर्यंत भाजपकडून कुठलाही आकडा समोर आला नव्हता यानंतर पहिल्यांदाच भाजपची संभाव्य आकडेवारी समोर आली आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा?
सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने विधानसभा निवडणुकीत 155 जगांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी तयारी सुरू केली असून, शिंदे गटाची 100 जागांची मागणी असून, त्यापैकी 60 ते 65 जागा शिंदे गटाला आणि अजित पवार गटाची 90 जागांची मागणी असून त्यापैकी 50 ते 55 या दोन्ही पक्षांना देण्याची तयारी भाजपने दाखवली असल्याचे समजते. तर महायुतीतील अन्य तीन मित्र पक्षांसाठीही 15 जागा देण्यासाठी भाजप सकारात्मक असून, आता जागा वाटपाच्या चर्चेत रामदास आठवले, राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय मागणी करतील आणि भाजप यासाठी तयार होईल का..? हे पहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यातील जनतेने फार काही पसंती दर्शविली नाही. तर, केवळ 17 जागांवर महायुतीला समाधान मानावे लागले. तर मविआन आघाडी घेत तब्बल 30 जागांवर विजय मिळवला. तर 23 जागा लढवून भाजपने केवळ 9 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपची या विधानसभा निवडणुकीसाठी कोणती नवी योजना असेल हे पाहावे लागणार आहे.