आशाताई बच्छाव
६ जुलैपासून प्रत्येक जिल्ह्यात जरांगेंचा नवा प्लॅन, समाजाला भावनिक आवाहन
सतीश सावंत (कसमादे विभागीय प्रतिनिधी)
मी एकटा पडलोय, मराठा जात संकटात, जरांगेंची समाजाला भावनिक साद..
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलै पर्यंतचा नवा अल्टिमेटम दिला असून, दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही आपले आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान, “मी एकटा पडलो आहे आणि मराठा जात संकटात सापडली आहे!” असे भावनिक आवाहनही मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तसेच यावेळी जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
राज्यातील सर्व ओबीसी नेते त्यांचे आरक्षण वाचवण्यासाठी एकजुटीने उभे राहिले असून त्यामुळे मी एकटा पडलो आणि आरक्षणाअभावी मराठा जात संकटात सापडली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यावर गोरगरीब मराठ्यांची लेकरं मोठी होतील आणि ते मोठे अधिकारी होतील अशी भीती त्यांना वाटतेय. त्यामुळे मला घेरलंय. मी एकटा पडलो असून, सत्ताधारी पक्षातील मराठे नेते आणि विरोधी पक्षातील खासदारही माझ्या बाजूने बोलत नाहीत. त्यामुळे जर आपल्या लेकरांचं वाटोळ होऊ द्यायचं नसेल, तर सगळ्यांनी एकत्र राहिल पाहिजे आणि त्यासाठी 6 जुलैपासून सुरू होणाऱ्या मराठा समाजाच्या शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
ओबीसी नेत्यांनी सिद्ध करून दाखवलं, मराठा नेत्यांनीही…
ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की ओबीसी नेत्यांसाठी निवडणुकीपेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाच आहे. तर, मराठा समाजाच्या नेत्यांनीही फक्त निवडून येण्यापेक्षा किंवा केवळ आपल्या पदाची चिंता करण्यापेक्षा जात आणि जातीचं आरक्षण महत्त्वाच आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
त्यामुळेच आता मराठा जात संकटात सापडली असून माझे मराठा समाजाला आवाहन आहे की येत्या 6 ते 13 जुलै पर्यंत होणाऱ्या शांतता जनजागृती रॅलीला समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. 6 तारखेपर्यंत समाज बांधवांनी आपली सर्व काम उरकून घ्यावीत आणि 6 जुलैला एकाही मराठ्याने घरात न राहता आपल्या शांतता जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे.
प्रत्येक जिल्ह्यात होणार शांतता जनजागृती रॅली
तसेच त्या दिवशी कोणीही गावाच्या बाहेर किंवा लग्नकार्याला जाऊ नका. प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या या शांतता जनजागृती रॅलीला ताकदीने आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद द्या. आपल्याला घेरलं गेलंय आणि आपली जात संकटात सापडली आहे. मी एकटा पडलो असलो तरी पण मी मागे हटणार नाही. मी मेलो तरी काही हरकत नाही, पण मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळवून देईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.