आशाताई बच्छाव
सटाणा येथील फौजदार बंगला दारूबंदी विभागाच्या अधिका-यांकडून सील
भास्कर देवरे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर ते नियुक्ती वर | असतांनाच शासकीय बंगला न वापरता तो बंगला धुळखात पडला होता. पोलिस निरीक्षकांनी पदभार सोडल्यानंतर काही दिवसांतच येथील दारूबंदी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कुलूप लावून सील केले आहे. अचानकपणे झालेल्या या कार्यवाहीमुळे येथील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे की, सटाणा शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या ताहाराबाद रस्त्यावर दारूबंदी विभागाच्या कार्यालया शेजारी सटाणा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे ‘यशवंत’ निवासस्थान आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या कौलारू बंगल्यास फौजदार बंगला म्हणून संबोधले जात असून आपल्या कर्तव्यावर कार्यरत असलेले अधिकारी या ठिकाणी वास्तव्यास असतात.
पोलीस अधिकाऱ्यांच्या सदर बंगल्याच्या शेजारीच दारूबंदी विभागाची जागा असून अलीकडेच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे.
दरम्यान गेल्या दिड वर्षांपासून सटाणा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक पदावर सुभाष अनमुलवार यांची नियुक्ती झाली होती. त्यांनी सरकारी बंगला नाकारून खाजगी बंगल्यात राहणे पसंत केले होते. गेली दिड वर्ष हा शासकीय बंगला धुळखात पडला होता. पोलिस निरीक्षक सुभाष अनमुलवार यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पदभार सोडताच दारू बंदी विभागाच्या अधिकाऱ्यांना आयते कोलीत सापडत नविन अधिकारी या बंगल्यात येण्यापुर्वीच येथील दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून सदर बंगल्यास व प्रवेशदाराच्या गेटला कुलूप लावून सील केलेले आहे. संबंधित विभागाने अचानक पणे केलेल्या या कार्यवाहीमुळे येथील पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे
निवासस्थान असलेल्या बंगल्याची जागा ही
दारूबंदी विभागाचीच असून 1930 सालातील सातबारा उताऱ्यावर अबकारी बंगला अशी नोंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. दारूबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सदर कार्यवाही संदर्भात पोलीस विभागाला लेखी पत्र पाठविल्याचे समजते. मात्र या पत्रातील अधिकृतपणे असलेला मजकूर मिळविण्यासाठी सटाणा पोलीस ठाण्यातील तपशिल मिळू शकला नाही.
• ताहाराबाद रोडवरील फौजदार बंगल्याचा परिसर मागील अधिकाऱ्यांनी वृक्षारोपण करून हिरवळ फुलवली होती. बंगल्याला रंगरंगोटी मुळे सौंदर्य प्राप्त झाले होते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा बंगल्यावर पडत मात्र गेल्या दिड वर्षापासून बंगला बंद असल्यामुळे येथील झाडं झुडपांची दुरावस्था झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा पडणे ही बंद झालं. अचानक झालेल्या कारवाईमुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.