आशाताई बच्छाव
पाऊस आकाशीचा आणि देशभक्तीचा 100 फूटी ध्वजस्तंभावर शानदार ध्वजारोहण
रत्नागिरी दि. १३,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा मोहिमेला आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 100 फूटी स्तंभावरील ध्वजारोहणाने सुरुवात झाली. मुसळधार पाऊसधारांमध्ये भिजत हजारो रत्नागिरी करांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व राष्ट्रभक्तीची ओळख करुन दिली.
जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांच्या हस्ते हे ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आदिं प्रमुख उपस्थिती होती. तसेच अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी रत्नागिरी विकास सुर्यवंशी, रत्नागिरी तहसिलदार शशिकांत जाधव आदिंची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशस्त प्रांगणात हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विविध शाळांचे व महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक उपस्थित होते. यामुळे प्रांगण फूलुन गेले होते.
भव्य असा राष्ट्रध्वज वर जाताना सारे जण स्वातंत्र्याचा जयघोष करीत हातो व सर्वांनी आपापल्या हातातही तिरंगा सन्मानाने धरला होता. त्याच सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली मात्र उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. एक बाजूला आकाशातील पाऊस आणि त्याखाली तिरंग्याला वंदन करीत राष्ट्रभक्तीचा पाऊस असे चित्र या ठिकाणी दिसून आले.
यावेळी पोलीस दलाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली व पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत सादर केले. भर पावसात चिंब भिजत महाविद्यालयीन युवतींनी जयगान यावेळी सादर केले. क्रिडाधिकारी कार्यालयातील स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार देण्यात आले.
*तिरंगा रॅलीला भरघोस प्रतिसाद*
याच ठिकाणावरुन दुचाकी, चारचाकी व रिक्षा यांची एकता तिरंगा रॅली निघाली याला जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला व ते स्वत: या रॅलीत सामिल झाले. त्यांचे दुचाकीवरील सारथ्य पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी केले.
या रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस दर, हेल्पिंग हॅन्डस, रत्नागिरी पत्रकार परिषद, व्यापारी संघटना, श्री रत्नागिरीचा राजा मित्रमंडळ यांनी संयुक्तपणे केले. रॅलीत रत्नागिरी ऑटोमोबाईल संघटना, कृषी विभाग, नगरपालिका यांचे चित्ररथ देखील होते.