आशाताई बच्छाव
जिल्हा प्रशासन, जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, लायन्स क्लबतर्फे आयोजन
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथे जनजागृती संघाच्या पुढाकाराने आयोजित सायकल रॅलीला मुसळधार पावसामध्येही बालगोपाळांसह युवा, ज्येष्ठ सायकलपट्टूंचा उदंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती संघ, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे ही रॅली सकाळी काढण्यात आली. येत्या १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन या रॅलीतून करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तिरंगी रंगांचे फुगे आकाशात सोडले व रॅलीला प्रारंभ झाला. त्यांनी सर्व सायकलपट्टूंची ओळख करून भर पावसातही आल्याबद्दल अभिनंदन करत बालदोस्तांचेही विशेष कौतुक केले. भारतमाता की जय, वंदे मातरम यासह स्वातंत्र्यवीर, राष्ट्रपुरुषांचा जयजयकार करण्यात आला.
मिशन हर घर तिरंगा अभियानाच्या जनजागृती मोहिमेसाठी 7 ऑगस्ट सकाळी ८ वाजता जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ. पाटील व सौ. पाटील यांनी आकाशात फुगे सोडले आणि रॅलीला प्रारंभ झाला. याप्रसंगी जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, कॅ. कोमल सिंग, सुधीर रिसबूड, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी, दर्शन जाधव, महेश सावंत, योगेश मोरे, निलेश शाह, विनायक पावसकर, श्रद्धा रहाटे, डॉ. सनगर आदींसमवेत लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रविण जैन, सचिव विशाल ढोकळे, ओंकार फडके, पराग पानवलकर, दिप्ती फडके, गणेश धुरी, दत्तप्रसाद कुलकर्णी, राजीव लिमये, प्रमोद खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सायकल रॅलीचा मार्ग जयस्तंभ येथून एसटी स्टॅन्ड, राम आळी, गोखले नाका, लक्ष्मीचौक, पतितपावन मंदिर, जोशी पाळंद, टिळक आळी, कॉंग्रेस भवन, आठवडा बाजारमार्गे पुन्हा जयस्तंभ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली. या रॅलीसंबंधी महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन केले होते. त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्यासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर आणि तहसीलदार शशिकांत जाधव उपस्थित होते.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संपर्क युनिक फाउंडेशनचे कार्यकर्तेसुद्धा या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीमध्ये प्रत्येक सायकलला तिरंगा फडकावण्यात आला होता. त्यामुळे सायकल रॅली तिरंगामय झाला. रॅली विविध प्रमुख ठिकाणांवरून जाताना नागरिकांनीही प्रोत्साहन दिले. छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वा. सावरकर, लोकमान्य टिळक यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. रॅलीदरम्यान सुरस स्नॅक्सने पाण्याची व्यवस्था आणि सांगतेप्रसंगी लायन्स क्लबतर्फे स्नॅक्सची व्यवस्था केली.
“आजची रॅली होणार का? खूपच पाऊस आहे, नियोजन कसं करणार? असे फोन सकाळी ७ पासून सुरू झाले. पण सव्वासात वाजल्यापासून सायकलिस्ट येऊ लागले. बालगोपाळांचा आज सुट्टीचा दिवस आणि त्यात जोरदार पाऊस, त्यांचे पालक पाठवतील का? अशी शंका होती. पण त्यांचा उत्साह तर अभूतपूर्व होता. दहा वर्षापासून ७० वर्षांपर्यंतच्या सायकलपट्टूंनी रॅलीत भाग घेतला. सर्वांच्या सहभागातून हा राष्ट्राभिमान जागृत करणारा उपक्रम यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट दिली.